
दक्षिणामुखी श्री हनुमान मंदिराचा आज कलशारोहण सोहळा शंकराचार्यांच्या हस्ते भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न!
रत्नागिरी :- रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रांगणात असलेल्या दक्षिणामुखी श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. श्रीमती सत्यभामा कृष्णकांत बोरकर यांनी आपला मुलगा कै. लिलाधर कृष्णकांत बोरकर यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून हा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराचा कलशारोहण सोहळा आज दि. 23 मे रोजी करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
श्रीदेव भैरी, जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्ट-झाडगावतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला ट्रस्टचे अध्यक्ष सन्मा. मुन्नाशेठ सुर्वे, बारा वाड्यातील गावकरी, मानकरी, उत्सव समिती सदस्य, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या मंदिराचे सुबक बांधकाम मंदिर स्पेशालिस्ट विश्वायन कंस्ट्रक्शन-पावसचे श्री. विनायक भाटकर यांनी उत्कृष्ट केले आहे.
कलशारोहण सोहळा बुधवार, गुरुवार व शुक्रवार असा दिन दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. बुधवारी श्रीराम मंदिर ते भैरी मंदिर अशी कलश मिरवणूक काढण्यात आली, गुरुवारी पुण्याहवाचन, देवता स्थापना, वास्तू संप्रोक्षण, देव संप्रोक्षण, तसेच कलश स्नानविधी करण्यात आले. शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून कलशारोहण सोहळ्याला प्रारंभ झाला. देवता पूजन, होमहवन, सत्य मारुती पूजा, पूर्णाहुती, बलिदान अशा धार्मिक विधीनंतर कलशारोहण सोहळा पार पडला. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा साजरा करण्यात आला. श्री कालभैरव प्रासादिक भजन मंडळ-मुरुगवाडा-बुवा दीपक पिलणकर, श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ-केळ्ये-बुवा-उदय मेस्त्री आणि दीनानाथ बारगुडे, श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ-कोतवडे-बुवा विजय मयेकर, श्री राम प्रासादिक भजन मंडळ-शिरसे-बुवा संतोष शिरसेकर यांची भजने पार पडली. तर श्री अनिरुद्ध बापू शहर उपासना केंद्रातर्फे हनुमान चालीसा पठण करण्यात आले.