
रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामामुळे रत्नागिरीकरांची वाहतूक कोंडीने दैना!
रत्नागिरी: मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू असल्याने रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप परिसरात नुकतीच प्रचंड वाहतूक कोंडी झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम सुरू असल्याने, रत्नागिरीकरांना मान्सूनपूर्व पावसातही या कामाचा फटका बसत आहे. काँक्रिटीकरण चालू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे, ज्यामुळे कोंडीत भर पडत आहे.
रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनचालकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. त्यातच दोन्ही बाजूंनी वाहतूक असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. साळवी स्टॉप ते जे.के. फाईल्स या अवघ्या २०० मीटरच्या अंतरावर जाण्यासाठी तब्बल अर्धा ते एक तास लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाहतूक कोंडीत पादचारी आणि मोकाट गुरेही जात असल्याने परिस्थिती आणखी बिघडत आहे.
या मार्गाच्या कामामुळे वाहतूक वळवण्यात (डायव्हर्जन) आली आहे. मात्र, वळवण्यात आलेला रस्ताही खराब असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. यामुळे रत्नागिरीकरांना या महामार्गाच्या कामामुळे होणाऱ्या त्रासातून लवकर सुटका मिळेल अशी अपेक्षा आहे.