
राजापुर धोपेश्वर खंडेवाडीत चारचाकीचे नुकसान
राजापूर : काल दिवसभर मुसळधार बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने आज (बुधवारी) राजापूर तालुक्यात काहीशी विश्रांती घेतली. दिवसभर सरींवर सरी कोसळत असल्या तरी पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, पावसाच्या या विश्रांतीनंतरही तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेची बत्ती गुल असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले होते. काही गावांमध्ये वीजपुरवठा कार्यान्वित असला तरी तो सातत्याने खंडित होत असल्याने नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मान्सूनपूर्व पावसाची ही स्थिती असेल तर प्रत्यक्ष पावसाळ्यात काय परिस्थिती असेल, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शहरानजिकच्या धोपेश्वर खंडेवाडी येथे संतोष खंडे यांच्या चारचाकीवर वीजवाहिन्यांचा पोल कोसळल्याने त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी धोपेश्वर घाटात एक झाड पडल्याने वीजवाहिन्या तुटल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कमी-जास्त प्रमाणात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. अशातच काल, मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अक्षरशः पावसाने राजापूरवासियांना झोडपून काढले होते. पावसाळ्याच्या अनुषंगाने गटारांची साफसफाई केल्यानंतरही शहरातील अनेक भागांमध्ये गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याचे चित्र होते. मात्र, शहरामध्ये कुठेही फारसा चिखलाचे साम्राज्य झाल्याचे दिसले नाही. या पावसात तालुक्यात कुठेही फारसे नुकसान झाल्याची नोंद झालेली नाही. तथापि, काही गावांमध्ये विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये विजेची बत्ती गुल झालेली आहे. खंडित झालेला वीजपुरवठा कार्यान्वित करण्याचे महावितरण विभागाकडून प्रयत्न सुरू असले तरी, सायंकाळी उशिरापर्यंत अनेक गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.
काल दिवसभरामध्ये तालुक्यात ४४.६२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती, तर आज पावसाचा जोर कमी राहिला. दिवसभर सरींवर पाऊस कोसळत होता. आजपर्यंत एकूण सरासरी ६८.६१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.