
कोकणची पोरं हुश्शार; यावर्षीही राज्यात अव्वल
रत्नागिरी:-
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च २०२५ च्या परीक्षेत कोकण बोर्डने ९६.७४ टक्के गुण मिळवून राज्यातील नऊ विभागात सातत्याने सर्वाधिक निकाल लावण्याची परंपरा कायम राखली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९८.७४ टक्के लागला असून रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९५.६६ टक्के एवढा लागला आहे.२०१२ साली स्थापन झालेल्या या बोर्डासह मुलींनीही आपली आघाडी कायम राखली असल्याची माहिती विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी सहसचीव दीपक पवार, सहायक सचिव मनोज शिंदे उपस्थित होते.
एचएससी बोर्डाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला आहे. यंदा तब्बल ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.
कोकण विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी सांगितले की, “पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत झालेल्या या परीक्षेच्या निकालात कोकण बोर्ड यंदाही अव्वल राहिले. यंदा कोकण बोर्डातून या परीक्षेला ११,९५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ११,४९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.५० टक्के इतके आहे. तर परीक्षेला ११ हजार ६०७ विद्यार्थिनी बसलेल्या होत्या. त्यापैकी ११ हजार ३७९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.०३ टक्के इतकी आहे. मार्च २०२४ मधील बारावी परीक्षेची निकालाची तुलना करता २०२५ मध्ये कोकण बोर्डाच्या लागलेल्या निकाल ९६.७४ टक्के इतका आहे. तर सन २०२४ चा निकाल ९७.५१ टक्के इतका होता. हा निकाल पाहता गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २०२५ मध्ये लागलेल्या निकालात ०.७७ टक्के इतकी घट झाली आहे.
यावर्षी बारावी परीक्षेत एकूण २३ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजर ५६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेत एकूण २२ हजार ७९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ही टक्केवारी ९६.७४ इतकी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून या परीक्षेत ७,७०५ मुलगे परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७,२४२ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी ९३.९९ इतकी आहे. तर मुली ७,५९२ बसल्या होत्या. त्यापैकी ७,३९३ उत्तीर्ण झाले आहेत. ९७.३७ इतकी आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या परीक्षेला ४,२५१ मुले बसले होते. त्यापैकी ४,१७६ मुले उत्तीर्ण झाले आहे. ही टक्केवारी ९८.२३ इतकी आहे. तर ४,०१५ मुली या परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी ३,९८६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ही टक्केवारी ९५.५० इतकी आहे.
राज्यात बारावी परीक्षा निकाल ९१.८८ टक्के टक्के लागला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के होता. फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या तुलनेत फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल १.४९ टक्क्यांनी कमी झाला आहे.
परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला
विभागनिहाय निकाल :
पुणे ९१.३२ टक्के, नागपूर ९०.५२ टक्के, संभाजीनगर – ९२.२४ टक्के, मुंबई- ९२.९३ टक्के, कोल्हापूर – ९३.६४ टक्के, अमरावती – ९१.४३ टक्के, नाशिक ९१.३१ टक्के, लातूर ८९.४६ टक्के, कोकण – ९६.७४ टक्के.