
रास्ता रोको प्रकरणी आ. निलेश राणे, माजी आ. बाळ माने यांच्यावर दोषारोपपत्र दाखल
रत्नागिरी:-
‘गोमाता के सन्मान मे, हर हिंदू मैदान मे’, ‘प्रशासन हाय-हाय…’ अशा गगनभेदी घोषणा देत सकल हिंदू समाजाच्यावतीने दणदणीत मोर्चा काढून जेलनाका येथे रास्ता रोको केल्याप्रकरणी आ. निलेश राणे, माजी आ. बाळ माने यांच्यासह तब्बल ४५० जणांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या सर्वांना सोमवारी वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले असून हा खटला येथील न्यायालयात सुरू झाला आहे.
जुलै २०२४ मध्ये एमआयडीसी परिसरात उपयुक्त प्राण्याच्या पिल्लाचे मुंडके सापडल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला होता. हिंदुत्त्ववादी संघटनांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. या प्रकरणातील आरोपींना अटक करा, अशी मागणी त्यावेळी लावून धरली होती. ही गोवंश हत्या असल्याचा आरोप त्यावेळी अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी केला होता. याप्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. याची गंभीर दखल आमदार निलेश राणे यांनी घेतली होती.
४८ तासांची मुदत संपल्यानंतर रत्नागिरीत सकल हिंदू समाजाच्यावतीने दणदणीत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेकडोंच्या संख्येने हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्त्व आमदार निलेश राणे यांनी केले होते.
मारुती मंदिर येथून निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला होता. पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चेकरी धडकणार होते. मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलीस आणि मोर्चेकरी यांच्यात शाब्दिक चकमकीदेखील घडल्या होत्या.
७ जुलै रोजी धो-धो पावसात मारुती मंदिर येथून हा मोर्चा निघाला होता. या मोर्चाचे नेतृत्व आमदार निलेश राणे यांनी केले होते. यावेळी जेल नाका परिसरात आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. दोन्ही मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी खोळंबली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी आंदोलकांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२), १८९(३), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
सोमवारी याप्रकरणी येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये आमदार निलेश राणे यांच्यासह माजी आमदार बाळ माने, चंद्रकांत श्रिधर राऊळ, राकेश नलावडे, नंदकुमार चव्हाण, राज परमार, स्वरुप पाटील, पराग तोडणकर, दत्तात्रय जोशी, अक्षय चाळके, स्वयम नायर, संतोष पवार, देवांग गोसावे, समर्थ पाटील, प्रेम पाटील, रोहित शिंदे, सागर कदम, गणेश गायकवाड, अथर्व दळी, सचिन नानिवडेकर, गौरव पावसकर, अद्वैत कुलकर्णी, राजेंद्र फाळके, संदीप नाचणकर, विराज चव्हाण, सचिन वहाळकर, राजेश तोडणकर, अमोल श्रीनाथ यांच्यासह सुमारे ४०० ते ५०० जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सोमवारी हे दोेषारोपपत्र दाखल केल्यानंतर वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वांना सोडण्यात आले. याप्रकरणी न्यायालयात ऍड. भाऊ शेट्ये, ऍड. रत्नदिप चाचले, ऍड. स्वाती शेडगे, ऍड. सोनाली रहाटे, ऍड. निनाद शिंदे, ऍड. सचिन थरवळ यांनी संशयितांच्यावतीने काम पाहिले.