
जिजाऊ शैक्षणिक संस्थेतर्फे तालुकास्तरीय नमन स्पर्धेचा रंगारंग समारोप
रत्नागिरी,: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय नमन स्पर्धेचा १७ ते २१ एप्रिल या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात समारोप झाला. या स्पर्धेत तालुक्यातील दहा नमन मंडळांनी सहभाग घेतला होता.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या पहिल्या तीन मंडळांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. यात प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये, द्वितीय ४१ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक ३१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यासोबतच स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहा कलाकारांना वैयक्तिक सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. यात उत्कृष्ट स्त्री-पात्र, उत्कृष्ट मृदंग वादक, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट विनोदी अभिनय, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वेशभूषा आणि उत्कृष्ट बालकलाकार यांचा समावेश होता.
पारितोषिक वितरण समारंभासाठी जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना सांबरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या सांस्कृतिक ठेव्याचे जतन करतानाच अभ्यासातही कठोर परिश्रम घ्यावे आणि शासकीय सेवेत अधिकाधिक संख्येने रुजू होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. तसेच, कोकणातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकू नयेत, त्या टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या तालुकास्तरीय नमन स्पर्धेसाठी
जिल्ह्याभरातून, विशेषतः ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रसिकांनी हजेरी लावली होती. पारंपरिक वेशभूषा आणि नमन गायनाच्या बहारदार सादरीकरणामुळे नाट्यगृहातील वातावरण उत्साहाने भारलेले होते.