
हापूसचे उत्पन्न मार्च महिन्यात पन्नास टक्केनी घटले
रत्नागिरी: बदलत्या वातावरणामुळे परिणाम कोकणातील संवेदनशील हापूसवर होत आहे. दिवसा कडकडीत उन आणि रात्री थंडी या वातावरणामुळे मार्च महिन्यात आंबा तयार होण्याचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मार्च महिन्यात मुंबईतील वाशी बाजारात हापूसच्या पेट्या पाठविण्याचे प्रमाण यंदा पन्नास टक्केनी घटलेले आहे. सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून २२ हजार पेट्या दररोज वाशी बाजारात जात आहेत. गतवर्षी याच कालावधीत हापूसच्या ४० हजार पेटींची आवक होती.
कोकण किनारपट्टीला फयान वादळाचा तडाखा बसल्यानंतर दरवर्षी वातावरणात बदल होत आहेत. त्याचा परिणाम दरवर्षी हापूसच्या उत्पादनावर होतो. किडींचा प्रादुर्भाव वाढला असून उत्पादन खर्चात भर पडत आहे. त्याचा परिणाम नफ्या-तोट्यावर होत आहे. कलमांवरील पालवी, मोहोर आणि फळ सुरक्षित ठेवण्यासाठी विविध प्रकारची महागडी औषधे वापरली जात आहेत. यंदा मोसमी पाऊस लांबल्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रियेला विलंब झाला. पहिल्या टप्प्यातील पिक पाच टक्केच राहिले. हंगामाच्या सुरवातीला चांगले उत्पादन राहील अशी स्थिती होती. परंतु वातावरणातील बदलांनी उत्पादन केव्हा येईल याबाबात बागायतदार धास्तावले होते. पहिली पेटी फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्याती बाजारात गेली असली तरीही त्यानंतर पेट्या पाठविण्याचा वेग कमीच राहिला. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात मुंबईतील वाशी बाजारात सरासरी १५ हजार पेट्यात जातात. यंदा या कालावधीत ५ ते ८ हजार पेटीच कोकणातून जात होती. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्यांची संख्या अवघी दीड ते दोन हजार एवढीच होती. फेब्रुवारी महिन्यात पारा ३५ ते ३७ अंशावर स्थिर होता. या काळात कणी पिवळी पडून वाया गेली. पुढे मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता कायम राहिल्याने आंबा भाजला. त्याच परिणाम उत्पादनावर होत आहे.
या महिन्याच्या शेवटच्या टप्यात दिवसा उन आणि रात्री थंडी असे विचित्र वातावरण आहे. त्यामुळे फळ तयार होण्याची म्हणजेच काढणीयोग्य होण्याचा कालावधी लांबला आहे. सध्या वाशी बाजारात दररोज हापूसच्या २० ते २२ हजार पेट्या कोकणातून जात आहेत. १ एप्रिलपासून हापूसच्या पेट्यांची संख्या वाढेल असे बागायतदारांकडून सांगितले जात आहे. आवक कमी असल्यामुळे दर २० टक्के अधिक आहेत. बाजारात २ हजार ते ६ हजार रूपये दराने पेटी विकली जात आहे.