
जिल्ह्यात ‘धरण उशाला, कोरड घशाला’
रत्नागिरी: राज्यातील सर्वाधिक पाऊस हा कोकणात पडतो. इतकेच नव्हे, तर देशातील सर्वाधिक पाऊस पडणार्या भागांमध्ये कोकणचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, धरणे भरतात, पूर येतो तरीही कोकणाला विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी शेकडो गावांना टँकरने पाणी पुरवावे लागते.
कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. साधारण सरासरी 3 हजार ते 3 हजार पाचशे मिलिमीटर पाऊस पडतो. असे असले तरी कोकणाला पाणीटंचाईचा सामना करावाच लागतो. साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडूनही दरवर्षी जिल्ह्यात शेकडो गावांना टँकरने पाणी पुरवावे लागते. विशेष म्हणजे देशाच्या सरासरीपेक्षा हा पाऊस तीन पट जास्त आहे. पण, पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पावसाचे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. पावसाळ्यात अनेक ठिकाणी नद्यांच्या पुरांना सामना करावा लागतो.
मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही ते साठवता न येण्यामागे भौगोलिक कारणही सांगितले जाते. कारण कोकणातील लाल मातीचे पाणी साठवण क्षमता कमी आहे. डोंगरामुळे तसेच कातळ जमीनमुळे पाणी वाहून जाते. या कारणांचा यामध्ये समावेश होतो. असे असले तरी जे पावसाचे पाणी पडते त्यांचे योग्य नियोजन केले जात नाही, हे ही तितकेच वास्तव आहे. मुळात रत्नागिरी जिल्ह्यात धरणे, बंधारे यांचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी सरकारसह जनताही उदासीन आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षी 112 गावातील 297 वाड्यांना टँकरने पाणी पुरवावे लागले होते. गतवर्षी 21 फेब्रुवारीला लांजा तालुक्यात पहिला टँकर धावला होता. 15 जुनपर्यंत 112 गावात टॅकर धावत होते. 70 हजार नागरीकांना या पाण्यावर अवंलबून रहावे लागले होते. ह्यावर्षी 357 गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल, अशी दाट शक्यता आहे. तसा संभाव्य पाणी टंचाईकृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये 357 गावातील 712 वाड्यांचा समावेश आहे.