
राजापूरात वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का
राजापूर: राजापुर, लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघात बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत ६४.१७ टक्के इतके मतदान झाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील विविध मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांनी गर्दी केली होती. सकाळी ७ ते ११ या पाहिल्या चार तासात मतदार संघात सर्वत्र २४. ०७ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. तर दुपारी मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊन दुपारी १ वाजेपर्यंत ४०.९८ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. तर दुपारी ३ वाजेपर्यंत ५२. १९ टक्के इतके मतदान झाले आहे. तर शेवटच्या तीन तासात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊन सायंकाळी ६ अखेर मतदार संघात ६४.१७ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मतदानाचा टक्का नऊ टक्क्यांनी वाढला असुन या वाढलेल्या टक्का कोणाला धक्का देणार याची उस्तुकता लागून राहिली आहे. गतवर्षी राजापूर विधानसभा मतदार संघात ५५.४९ टक्के इतके मतदान झाले होते.
राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघात एकूण आठ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये भाजपा शिवसेना महायुतीतर्फे किरण सामंत, महाविकास आघाडीतर्फे विद्यमान आमदार राजन साळवी तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड हे अपक्ष लढत आहेत. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीतर्फे संदिप जाधव, अमृत तांबडे, यशवंत हर्याण, राजेद्र साळवी, संजय यादव हे अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत.
या निवडणुकीत जाहिर प्रचारसभांऐवजी प्रमुख राजकिय पक्षांच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावरच लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्काही वाढला आहे.
राजापुर, तांजा-साखरपा विधानसभा मतदार संघात एकूण ३४५ नतदान केंद्र असुन २६७-राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघात एकुण २ लाख ३८ हजार ४०९ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख २४ हजार ५७० स्त्री मतदार तर १ लाख १३ हजार ८३९ पुरूष मतदारांचा समावेश आहे. यामध्ये स्त्री मतदारांची संख्या ही अधीक असल्याने या महिला मतदारांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. सकाळी ७ वाजता सर्व मतदान केंद्रावर मतदानाची सुरुवात झाली. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदार संघात ६४.१७ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाला आहे. तशी माहिती प्रशासनाने दिली आहे. या एकुण २ लाख ३८ हजार ४०९ मतदारांपैकी एकूण १ लाख ५२ हजार ९९८ मतदारांनी मतदानाचा हक्क झाला आहे. यामध्ये ७३ हजार ३४ पुरूष तर ७७ हजार ६६४ महिला मतदारांचा समावेश आहे.
राजापुर मतदार संघात अत्यंत शांततेत ही मतदान प्रक्रिया पार पडली आहे. प्रशासनाच्या वतीने यासाठी सुयोग्य असे नियोजन करण्यात आले होते. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात मतमोजणीला प्रारंभ होणार असून एकूण २५ फेऱ्यांमध्ये २० टेबलांवर ही मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.