
संगमेश्वरातील मताधिक्य निर्णायक ठरणार
चिपळूण विधानसभा निवडणूक ; मतदारांना आकर्षित करणारे मुद्दे कोणते याची उत्सुकता
चिपळूण:- चिपळूण मतदारसंघातील निवडणूक स्वच्छ, निष्कलंक आणि जनमानसात मिसळणारे व्यक्तिमत्त्व, पक्षनिष्ठा, गद्दारी या मुद्द्यांवर चिपळूणची निवडणूक लढवली गेली. यातील कुठले मुद्दे मतदारांना आकर्षित करणारे ठरले याची सर्वांना उत्सुकता आहे. एकास एक लढतीत देवरुख संगमेश्वर भागातून ज्यानी २५ हजारापेक्षा जास्त मतदान घेतल्यास चिपळूणची निवडणूक निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
सभोवताली असणारे कार्यकर्ते आणि नेतेमंडळी यांनी केलेली मदत तसेच अडीअडचणीत कोण धावून येणार या विषयावर मतदारांनी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अंतिम टप्प्यात प्रवेश केल्यानंतर ती अतिशय निर्णायक वळणावर आली. जोर कुणाचा याबाबत वेगवेगळे मतप्रवाह येत असले तरी चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, शिवसेना नेते भास्कर जाधव यांची मतदारांवर किती छाप पडली. अल्पसंख्यांक समाजाचे झालेले विभाजन कुणाला तारणार याबाबत राजकीय जाणकारांमध्ये चर्चा झडू लागल्या आहेत.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी आमदार सुभाष बने, माजी मंत्री रवींद्र माने यांना मानणारा मतदार कुणाचा घात करणार ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. रमेश कदम यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता त्यांनी भविष्यातील राजकीय वाट चोखाळताना कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही ही भीमगर्जना चिपळूणच्या नवीन नेतृत्व उमलायला लागल्याची चर्चा आहे.
विद्यमान आमदार शेखर निकम यांची विकासकामे, खंदे कार्यकर्ते आणि पारंपरिक मतदारांवर भिस्त तर प्रतिस्पर्धी उमेदवार प्रशांत यादव यांचे बेरजेचे राजकारण आणि मित्रपक्षांवर मदार असल्याचे बोलले जात आहे. यादव यांच्या बाजूने वाढत जाणारी समर्थकांची गर्दी, सोशल मीडिया आणि मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी या जमेच्या बाजू असल्यातरी विद्यमान आमदारांची गेल्या पाच वर्षात जतन केलेली व्होटबॅंक आणि जपलेले कार्यकर्ते उघडपणे कार्यरत होते. शेखर निकम यांनी अनेक पत्ते उघड केले नाही. परंतु निवडणुकीत त्यानी ते वापरले. निवडणुकीत ऐनवेळी होणाऱ्या खेळया त्यांनी खेळल्या.
या निवडणुकीत एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी तळागाळातील जनतेत संपर्काचे महत्त्वाचे स्तोत्र ठरणार आहे. शेवटी विजयी उमेदवार काठावरच्या लढाईत पास होणार असल्याबाबत नागरिकांच्यात चर्चा असून भारतीय जनता पार्टीने तळागाळात चांगली मशागत केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला ही निवडणूक हलक्यात घेऊन चालणार नाही.
—-
२०२९ च्या पुनर्रचनेचा विचार
२०२९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेचा विचार आतापासूनच सुरू झाल्याने याचा परिणाम निश्चितच जाणवणार आहे. यामुळे भविष्याचा वेध घेऊन राजकीय वाटचाल करताना काही गणितांची मांडणी या निवडणुकीत होणार आहे.