
गव्यांचा बागायतीसह शेतीला फटका
बागायतदार हतबल ; ठोस कार्यवाहीची वनविभागाकडे मागणी
राजापूर: कोकणात वानर, माकडे व बिबट्या, गवा जंगल सोडून मानवीवस्तीत वावर करू लागल्यामुळे शेतकरी व आंबा बागायतदार हतबल झाले आहेत. राजापूर तालुक्यातील भालावली परिसरात कित्येक एकरात आंबा, काजू लागवडीची गव्याकडून मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचे उदाहरण आहे. तसेच संगमेश्वर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्याचा काही भागात गव्यांच्या कळपांचे वास्तव्य आहे. याबाबत वनविभागाने गव्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.
गवा प्रामुख्याने दोडामार्ग जंगलात मोठ्या प्रमाणात वावरत आहे. गेले तीन-चार वर्षे राजापूर तालुक्यातील भालावली परिसरात गव्यांचा वावर वाढू लागला आहे. सुरवातीला दोनच गवे आढळून आलेले होते. आता त्यांची संख्या वाढून परिसरामध्ये आठ ते दहा कळपात झाली आहे. भालावली गाव १२ वाड्यांचा असून तेथील लोकसंख्या सुमारे १२०० ते १४०० आहे. या गावातील शेतकरी, बागायतदारांनी आंबा, काजू, नारळ यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु गव्यांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यांना पळवण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. आठ ते दहा फूट उंचीच्या झाडांवरील हिरवा पाला, मोहोराची गव्यांच्या कळपाकडून नासधूस होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हे गवे मोठे असून मोठी झाडे सहज उदध्वस्त करून टाकतात. या संदर्भात वनविभागाकडे तक्रार करण्यात आली. परंतु त्यांचा बंदोबस्त करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. यावर कार्यवाही न झाल्यास भविष्यात येथील बागायती शिल्लक राहणार नाही. बागायतीसोबतच भातशेतीचेही गवे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूने नुकसान होत आहे. हीच परिस्थिती संगमेश्वर, लांजा, गुहागर या तालुक्यातही निर्माण झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे जिल्हास्तरावर गांभीर्याने पाहावे, असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.
—-
कोट १
गव्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. सुरवातीला दोन गवे दिसले. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या उपद्रवासंदर्भात वनविभागाकडे लेखी पत्र दिले होते. परंतु त्यांच्याकडून कार्यवाही झालेली नाही. मनुष्य प्राण्यावर हल्ला केल्यानंतर त्याच्या नुकसानीची भरपाई देण्याची मानसिकता प्रशासनाची असते. त्यामुळे वनविभाग गव्यांच्या बंदोबस्ताविषयी निर्णय घेत नाही.
– रूपेश गुरव, ग्रामस्थ, भालावली
आंबा, काजूमधून उत्पन्न मिळावे यासाठीच लागवड केलेली आहे. परंतु गव्यांच्या वावरामुळे झाडांची मोठ्याप्रमाणात नासधूस होत आहे. ते गवे उंच व धिप्पाड असल्यामुळे त्यांच्या आवाक्यात येणाऱ्या झाडांची तोडमोड होते. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांचे नुकसान होते.