
महाविकास आघाडीकडून सुरू असलेल्या अपप्रचाराला जनता बळी पडणार नाही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा दावा
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी राज्य घटना बदलणार असल्याचा अपप्रचार महाविकास आघाडीकडून सुरू आहे. कोणतेही सरकार संविधानापेक्षा मोठे नाही. त्यामुळे सरकार कोणाचेही असो, त्यामुळे संविधान बदलले जाणार नाही हे निश्चित आहे. निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून सुरू असलेल्या अपप्रचाराला जनता बळी पडणार नाही. राज्यात महायुती एकत्रितरित्या लढत आहेत. आम्हाला पक्षादेश आला असून रत्नागिरी विधानसभेसह जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महायुतीचे काम करत असून येथे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या पाठिशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड.विलास पाटणे, ॲड.बाबासाहेब परूळेकर, ॲड.दीपक पटवर्धन, श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत केला.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी ज्येष्ठ नेते ॲड. विलास पाटणे यांनी महाविकास आघाडीतून सुरू असलेल्या आरोपांचे खंडन केले. नाणार येथील रिफायनरी रद्द झाल्यानंतर बारसू येथे रिफायनरी आणावी असे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. त्यावेळीही स्थानिकांचा विरोध होताच, परंतु आता मतांच्या राजकारणासाठी बारसू रिफायनरी सत्ता आल्यानंतर रद्द करू असे श्री.उद्धव ठाकरे सांगत आहेत. त्यांची ही दुटप्पी भूमिका आहे. त्यांच्या बदलत्या भूमिका जनतेसमोर आल्या आहेत. त्यामुळे जनता महायुतीसोबतच राहील. भारतीय जनता पाटने कायम प्रकल्पातून रोजगार निर्मितीवर भर दिला आहे. त्यामुळे बारसू येथे रिफायनरी झाली पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे शिवसेनेचे आमदार उदय सामंत निवडणूक रिंगणात आहेत. तर राजापुरातून किरण सामंत, चिपळूण-संगमेश्वरमधून श्री.शेखर निकम यांच्या प्रचाराचे काम भारतीय जनता पाटचे कार्यकर्ते करत आहेत. रत्नागिरी विधानसभेत जिल्हा परिषद गटनिहाय प्रचाराला कार्यकर्ते गुंतले आहेत. त्यामुळे ना. उदय सामंत यांच्या मताधिक्क्यात मोठी वाढ होणार असल्याचा दावा ॲड.पाटणे, ॲड.पटवर्धन यांनी केला आहे.