
अफवा पसरवून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न: ना. उदय सामंत
रत्नागिरी:- वक्फ बोर्डाशी माझा काडीमात्र संबंध नाही. गेल्या २ महिन्यांत रत्नागिरीत ४ प्रसंग घडले. त्यामध्ये मलाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला. वक्फ बोर्डाचं जे कार्यालय मंजूर झालं ते माझ्याकडून मंजूर झालेले नाही, तर राज्य शासनाने केलं. हिंदू धर्मात खोटं काही तरी पसरवून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ना. उदय सामंत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधानसभेची आचारसंहिता मंगळवारी जाहीर झाली. त्यापाठोपाठ आता उमेदवारांनी आपल्या मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. बुधवारी आचारसंहितेनंतरची पहिलीच राजकीय पत्रकार परिषद ना. उदय सामंत यांची झाली. यावेळी त्यांनी गेल्या २ महिन्यांत रत्नागिरीत जे प्रकार घडले आणि त्यातून एक नरेटीव्ह कशा पद्धतीने पसरवण्यात आले? यावर त्यांनी भाष्य केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राहुल पंडीत, जि.प.चे माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे, शहरअध्यक्ष बिपीन बंदरकर, दिपक पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. सामंत पुढे म्हणाले की गेल्या २ महिन्यात रत्नागिरीत ४ प्रसंग उद्भवले. पहिला प्रसंग एमआयडीसी परिसरात घडला. त्यावेळी आंदोलनदेखील झाले. दुसरा प्रकार एका अल्पवयीन मुलीबाबत घडला. त्यानंतर वक्फ बोर्डावरुन मला काळे झेंडे दाखवले आणि चौथा प्रकार आरएसएसच्या पथ संचलनात झाला. या घटनांशी माझा काही संबंध नसताना अप्रत्यक्षरित्या मला टार्गेट बनवण्यात आले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी खुल्लमखुल्ला आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले की, नाहक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनांमध्ये किंवा घडलेल्या घटनांत कुणाला वाचवण्यात माझा काहीच संबंध नाही हवं असेल तर त्यांनी माझे सीडीआर काढावेत. त्यातून सर्व माहिती समोर येईल. मात्र यापुढे नाहक आरोप अथवा बदनामी सहन करणार नाही, असा इशाराच ना. सामंत यांनी दिला.
वक्फ बोर्डावरुन बोलताना ना. उदय सामंत म्हणाले की, वक्फ बोर्डाचे कार्यालय हे माझ्याकडून मंजूर झालेले नाही. २५ मे २०२३ ला या बोर्डाला मंजूरी मिळाली. मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यासाठी प्रयत्न केले. याला मंजूरी शासनाने दिली आहे, हे शासनाने जेव्हा मला सांगितले की, वक्फ बोर्डाचे नुतनीरण झाले आहे. त्यांनी मला त्याचे उद्घाटन करायला सांगितले.
या पत्रकार परिषदेत ना. सामंत पोटतिडकीने बोलत होते. फेक नरेटीव्ह पसरवित असताना आता माझ्या वडिलांवरदेखील एका शिक्षकाकडून सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या जात आहेत. हिंदू धर्मात खोटं नाटं पसरवून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होताय. माझे आई-वडिलदेखील हिंदूच आहेत. त्यामुळे माझ्या धर्माचादेखील मला तितकाच अभिमान आहे.
वक्फ बोर्ड असेल किंवा आरएसएसचे पथ संचलन असेल, याविषयात माझ्याविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय. जर आरएसएसच्या मंडळींनी मला बोलवलं तर मी त्यांच्यासमोर वस्तुस्थिती ठेवेन आणि त्याचे पुरावेदेखील दाखवेन. मी पारदर्शक आहे. संघाच्या लोकांनी विचारले तर मी त्यांना पुरावे देईन. सरसंघचालक मोहन भागवत यांची मी भेट मागविली आहे. मी पारदर्शक आहे, असा खुलासाच त्यांनी यावेळी केला.
या पत्रकार परिषदेत ना. सामंत यांनी कुणाचेही नाव न घेता एक मिश्किल टीका केली. ते म्हणाले की, काही लोकं मातोश्रीवर जातात आणि तिकडे प्रामाणिक असल्याचे दाखवतात. मी माझी नाहक बदनामी सहन करणार नाही. आरएसएसच्या पथ संचलनानंतर जो काही प्रकार घडला त्यामध्ये माझ्याच कार्यकर्त्यांवर काही गुन्हे दाखल झाले आहेत. मी माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा असे सांगू शकेन का? त्यामुळे मी कोणत्याही प्रकारे या प्रकरणात हस्तक्षेप केलला नाही, असे ना. सामंत यांनी ठासून सांगितले.
रत्नागिरीतील मनोरुग्णालय जयसिंगपूरला हलवणार याविरोधात आंदोलन केलं गेलं. त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ही बाब अत्यंत खोटी आहे. ज्यांनी कोणी खोटी माहिती पुरवली आहे त्यांच्यावर कारवाई ही नक्कीच होईल, असा इशाराच ना. सामंत यांनी यावेळी दिला.