
जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु काळजी कक्ष ठरतोय वरदान
तीन बालकांवर यशस्वी उपचार
रत्नागिरी : जिल्हा शासकिय रुग्णालयातील विशेष नवजात शिशु काळजी कक्ष बालकांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. अत्यंत नाजूक स्थितीतील दोन जुळय़ांसह अन्य एका बालकांवर योग्य उपचार करण्यात आले. त्यामुळे तीनही बालकांच्या प्रकृतीत झालेल्या सुधारणेनंतर त्यांना योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देत घरी सोडण्यात आले.
जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी अलिकडे विविध सोयीसुविधांनी सज्ज होत आहे. येथे रुग्णांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होऊ लागल्याने जिल्हाभरातील सर्वसामान्य रुग्णांसाठी लाभदायी ठरत आहे. दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी श्रीम. अनवी ठीक, मु.पो. तरळ, ता. राजापूर यांया जुळ्या नवजात बालकांचा जन्म जिल्हा रुग्णालय झाला . बालक जन्मत खूपच कमी वजनाची (980 ग्रॅम, 990 ग्रॅम) व कमी दिवसांची (28 आठवडे) होती. तसेच दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी श्रीम पूजा धुमाळे, मु.पो. जुवाठी, ता. राजापूर, यांच्या नवजात बालकांला दाखल करण्यात आले. त्या बालकाचा जन्म हा ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी 3.45 वाजता झालेला होता. बालक जन्मत खूपच कमी वजनाचे (1300 ग्रॅम) व कमी दिवसाचे (39 आठवडे) होते.
या तिन्ही नवजात बाळांची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. परंतू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसएनसीयु विभागामध्ये कार्यरत बालरोगतज्ञ डॉ. विजय सुर्यागंध, डॉ. शायान पावसकर व डॉ. आदित्य वडगावकरतसेच अधिसेविका श्रीम जयश्री शिरधनकर, बालरोगतज्ञ परिचारीका श्रीम श्रुती जाधव व कक्ष परिसेविका श्रीम सुवर्णा कदम तसेच कार्यरत अधिपरिचारीका यांच्या अथक परिश्रमाने बालकांमध्ये सुधारणा होत गेली.
त्या बालकांना श्वसनाचा त्रास असल्याने व्हेंटिलेटर व्दारे कृत्रिमरीत्या श्वास देण्यात आला. तसेच बालकांना आरडीएस वर उपचारासाठी श्वसन नालिकेव्दारे सरफॅक्टंट देण्यात आले. मातेला रुग्णालयामधून मोफत आहार पुरविण्यात येत होता. बाळांच्या डोळयाची आरओपी तपासणी आणि उपचार खाजगी रुग्णालयामधून मोफत करुन घेण्यात आली. ४४ दिवसांनतर दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी डॉक्टरांच्या सल्याने बाळांना घरी सोडण्यात आलेले आहे. रुग्णालयातून सोडताना बालकांचे वजन 1675 ग्रॅम, 1860 ग्रॅम आणि 1610 ग्रॅम होते. त्या बालकांच्या नातेवाईकांना नियोजीत तारखांना तपासणीसाठी पुन्हा येण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी संबधीत बालकांच्या नातेवाईकांना तपासणीच्या तारखांची फाईल तसेच आशा स्वंयसेविकेच्या घरभेटी दरम्यान आशा कार्यकर्तीसाठी पाठपुरावा कार्ड देण्यात आलेले आहे.