मुलांच्या आधी पालकांवर संस्कार होणे आवश्यक
रत्नागिरी: आधुनिक युगात संस्कार आणि आरोग्य एकमेकांना पूरक असलेले भाग आहेत. त्यामुळेच मुलांना योग्य वळण लावण्याआधी पालकांवर संस्कार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. अक्षता सप्रे यांनी संस्कृत भारती आयोजित संस्कृतोत्सव कार्यक्रमात केले.
येथील भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन रत्नागिरी उपकेंद्रात संस्कृत भारतीतर्फे संस्कृत उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरीतील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. अक्षता सप्रे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ज्याप्रमाणे १६ संस्कार आपल्याला परिचित आहेत, अगदी त्याप्रमाणे आपल्या अन्नावर संस्कार होणे आवश्यक आहे. आपले मूल नीट वागत नसेल तर सुरुवातीस पालकांनी आपण कुठे कमी पडतो आहोत, याचा विचार करावा. करोनानंतर जशी शारीरिक प्रतिकारशक्ती वाढवण्यावर जोर दिला गेला, तशी सद्यःस्थितीत मानसिक प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रारंभी संस्कृतभारती दक्षिण रत्नागिरी मंत्री अक्षया भागवत यांनी संस्कृत भारतीचा प्रवास आणि विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. नाचणे येथील श्रीरामनगर बाल संस्कार केंद्रातील गार्गी शिंदे, अदिती गद्रे, सिद्धांत मराठे, अन्वेष कवठणकर, स्वरांजली हेगड़े या लहान मुलांनी प्रहसनात्मक नाटिका, एक अभिनय गीत व सामूहिक स्तोत्र गायन केले. याचे संयोजन बालसंस्कार केंद्राच्या शिक्षिका रश्मी मराठे यांनी केले होते.
शोध विद्यार्थी कौशल जोशी यांनी एकपात्री प्रयोग सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. यानंतर प्रा अविनाश चव्हाण यांच्या संचालनानुसार प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. संस्कृतभारतीचे दक्षिण रत्नागिरी अध्यक्ष डॉ. दिनकर मराठे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्कृत भाषा आणि तिची महत्ता याबाबत मार्गदर्शन केले.