
रत्नागिरीत मुसळधार पावसाचे पुनरागमन
रत्नागिरी : जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर रत्नागिरी तालुक्यात पावसाची रात्रीपासून संततधार सुरू असल्याने सकाळच्या सुमारास बाहेर पडणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे.
राज्यात आगामी चार दिवसांमध्ये म्हणजेच आज शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत मान्सून जोरदार सक्रिय होत असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, मुंबई, पालघरसह इतर 13 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर 28 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले असल्यामुळे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे आज(शनिवार) ते मंगळवार, (दि. 27) ऑगस्ट या कालावधीत राज्यात मान्सून जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे