
कोकणात रविवारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
रत्नागिरी: समुद्र सपाटीपासून साडेपाच किमी उंचीवर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा प्रबळ झाला आहे. त्यामुळे रविवार (दि.३०) पर्यंत कोकण किनारपट्टी भागात मुसळधार आणि दक्षिण कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. पालघर आणि रायागड जिल्ह्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरुवारी (दि.२७) सकाळी साडेआठ या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात ८२.११%.५३ मि.मी.च्या सरासरीने ७३९.०० मि.मी. एकूण पावसाची नोंदझाली. यामध्ये मंडणगड तालुक्यात ९२.५० मि. मी. दापोलीत ११७.८५, खेडमध्ये ७१.२८, गुहागरात ८३.००, चिपळूण तालुक्यात ७७.६६, संगमेश्वरमध्ये ६२.७५, रत्नागिरीत ९५.४४, लांजा तालुक्यात ५७.४० आणि राजापूर तालुक्यात ८१.१२ मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसात रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात तब्बल १७० मि.मी. एकूण पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ७०४ मि.मी. च्या सरासरीने एकूण ६३३६ मि.मी. एकूण पाऊस झाला आहे.
मोसमी पावसाची वाटचाल कोकण किनारपट्टी भागात वेगाने होताना दिसत आहे. यामुळे सागरी किनारी भागात अर्थातच कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. ३० जून अखेरपर्यंत कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. कोकणात गेल्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी काही ठिकाणी कोसळत आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली- सातेरे जामगे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ता खचला आहे. डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याने सुमारे १५० मीटर लांबीचा रस्ता खचला. धरण परिसरातील रस्ता असल्याने मृद जलसंधारण आणि सार्वजनिक बांधकाम मार्फत रस्त्याची आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे