
विहिरीत पडलेल्या खवले मांजराला वनविभागाकडून जीवदान
रत्नागिरी : लांजा शहराजवळच राहणाऱ्या सुधाकर गोपाळ कांबळे (रा. लांजा,बौद्धवाडी) यांच्या आंबा काजूच्या बागेतील विहिरीत बुधवार, (दिनांक १२ रोजी) दुपारी ३.३० च्या सुमारास विहीरीमध्ये खवले मांजर पडल्याचे दिसून आले. कांबळे यांनी तत्काळ भ्रमणध्वनीद्वारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कळविले.
घटनेची माहिती मिळताच तत्काळ वनपाल लांजा, वनरक्षक लांजा व वनरक्षक कोर्ले यांनी जाग्यावर दाखल होऊन पाहणी केली. या खवले मांजराला दोरीच्या साहाय्याने प्लास्टिक टोपले टाकुन सुरक्षितरित्या विहिरीबाहेर काढण्यात आले. खवलेमांजराची पशुवैद्यकीय अधिकारी लांजा यांनी वैद्यकीय तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
सदर कार्यवाही गिरीजा देसाई, विभागीय वनअधिकारी (प्रा) रत्नागिरी (चिपळूण), वै. सा. बोराटे, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा) रत्नागिरी (चिपळूण), प्र.ग. सुतार, वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.वि. आरेकर, वनपाल लांजा, श्रीम. कांबळे, वनरक्षक लांजा, श्रीम. पवार, वनरक्षक कोर्ले व रेस्क्यु टिमचे अमित लांजेकर यांनी पार पाडली.