
ईदच्या पार्श्वभूमीवर कोकण नगर येथे प्रतिष्ठित नागरिकांची बैठक संपन्न
रत्नागिरी : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोकणनगर येथील पोलीस चौकीत नुकतीच प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रित करून शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बकरी ईद हा सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक तोरस्कर यांनी केले.
बकरी ईदचा हा सण शहरासह ग्रामीण भागात मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यापुढेही परंपरा कायम राखल्यास कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. या सणाच्या निमित्ताने प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक झाली. कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता सामाजिक बांधिलकी जोपासली जावी या उद्देशाने शहर पोलीस निरीक्षक तोरसकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे, सोशल मीडियाचा गैरप्रकार टाळावा, चुकीचे संदेश, मेसेज, काही पोस्ट फॉरवर्ड न करता तत्काळ डिलीट कराव्यात, धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेजेस, पोस्ट याबाबत प्रतिक्रिया न देता त्याबाबत सजग राहून त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक तोरस्कर यांनी केले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.