
रत्नागिरी कौशल्य विकास केंद्रात आढळले बोगस परीक्षार्थी
रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाद्वारे रत्नागिरीतील थिबा पॅलेज नजिक सुरु असलेल्या कौशल्य विकास केंद्र येथे बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि रत्नागिरील जागरूक नागरिकांमुळे उघड झालं आहे.
शासनाकडून रत्नागिरीत चालवल्या जाणाऱ्या या कौशल्य विकास केंद्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकारचे घोटाळे होताना दिसून येत आहे. ज्यात विविध महाविद्यालयांच्या अंतर्गत शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखवण्याचे काम सुरु आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या जागी बनावट विद्यार्थ्याचे कागदपत्रे बनवून परीक्षा देण्यासाठी त्या बनावट विद्यार्थ्यांना बसवण्यात येत आहे. याप्रकरणी अभाविप चे पदाधिकारी आणि जागरूक नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई यांनी आज हा प्रकार उघडकीस आणला.

पालकमंत्री उदय सामंत हे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून स्थानिक युवकांना रोजगारासाठी चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी हे केंद्र सुरु केले असताना आता स्थानिकांचीच संधी हिसकावून घेतली जात असल्याचा हा प्रकार असल्याचे अभाविपसह कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकूरदेसाई यांनी म्हटले आहे.