
आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा :बंड्या साळवी
राऊतांना मिळालेल्या मतांचा ऊहापोह
रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला रत्नागिरी विधानसभेतून १० हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. यापुढे होणाऱ्या सर्वच निवडणुकीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना उबाठाचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिल्या.
दरम्यान, विनायक राऊत यांना कमी मताधिक्य मिळालेल्या भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची त्यांनी खरडपट्टीही काढली. माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात शिवसेना उबाठाची रत्नागिरी तालुका कार्यकारिणीची बैठक आज झाली. तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट व शहरातील प्रभागांचा आढावा घेण्यात आला. कोणत्या प्रभागात किती मताधिक्य मिळाले याच्यावर चर्चा झाली. कोणत्या ठिकाणी किती कमी मते मिळाली, यावरही कार्यकारिणीत ऊहापोह झाला.
गोळप जिल्हा परिषद गटामध्ये गोळप, भाट्ये, फणसोप येथील मोहल्ल्यांमधील, शिरगाव गटातही, पावसमध्ये पावस आणि गावखडी तर हरचिरी जिल्हा परिषद गटातही मुस्लिम मोहल्ल्यांमधील एकगठ्ठा मते मिळाल्याने मताधिक्क्य वाढले. परंतु ज्या भागात मुस्लिम समाजाची मते कमी आहेत, त्यातील काही गटांमध्ये मताधिक्य कमी झाल्याचे चित्र आहे. शहरामध्येही मताधिक्यामध्ये राजिवडा, मिरकरवाडा, कोकणनगर, उद्यमनगर येथील भागांनी तारल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिकेच्या निवडणुकांची तयारी करा, अशा सूचना बैठकीत दिल्या. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे शिंदेंबरोबर गेले. ते आता पालकमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून या मतदार संघात कोट्यवधींची विकास कामे सुरू आहेत. त्यामुळेही मतांची टक्केवारी घसरली असल्याचे मत तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
उबाठासाठी जमेची बाजू
गतवेळच्या निवडणुकीत भाजप सोबत असल्याने विनायक राऊत यांना ६० हजाराहून अधिकचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी भाजप विरोधात होती. शिवसेनेत फूट पडलेली असतानाही १० हजाराचे मताधिक्य मिळणे ही उबाठासाठी जमेची बाजू आहे. महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांचा हा वाटा आहे.