
कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अडीच लाख मतदार
रत्नागिरी: कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. २६ जूनला सकाळी ७ ते ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. गुजरात राज्याची सीमा ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत हा मतदार संघ असून त्यात ४८ तालुक्यांचा समावेश आहे. या निवडणुकीत अडीच लाख पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
यामध्ये सर्वाधिक मतदान ठाणे जिल्ह्यात ७३ हजार ३०५, रायगड- ४५ हजार ३३८, रत्नागिरी- २१ हजार ४२४, पालघर- ९ हजार ४८१, सिंधुदुर्गमध्ये १७ हजार ८४८ मतदारांची नोंदणी झाली आहे. चिपळूण तालुक्यात एकूण ४ हजार ५४ पदवीधर मतदार आहेत. चिपळूण तालुक्यात एकूण पाच मतदान केंद्र आहेत. मार्गताम्हाणे मतदान केंद्र क्र. ८६ यामध्ये २५९ मतदार, सावर्डे मतदार केंद्र ८४ येथे १२८४ मतदार, अलोरे मतदार केंद्र ८५ येथे एकूण ४१० मतदार तसेच चिपळूण तहसील केंद्रात एकूण दोन मतदान केंद्रे असून, मतदान केंद्र क्र. ८२ यामध्ये एकूण मतदार १११० तर मतदार केंद्र क्र. ८३ तहसील कचेरी चिपळूण यामध्ये एकूण १०९८ इतके मतदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १७ मतदान केंद्र आहेत. कोकण पदवीधर मतदार संघात विधान परिषदेमध्ये आतापर्यंत भाजपचा वरचष्मा राहिला आहे. निरंजन डावखरे एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले आहेत. भाजपने त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. काँग्रेसमधून रत्नागिरीचे उद्योजक रमेश कीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी पदवीधरांशी संपर्क साधत आहेत. सर्व पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
उमेदवारांसमोर लिहायचा पसंती क्रमांक
विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. यामध्ये मतदान करताना पदवीधरांनी मतदान केंद्रावर उमेदवारांची यादी असेल त्या ठिकाणी तिथल्या पेनाने पसंती क्रमांक एक असे लिहिल्यानंतर मतदान पूर्ण होते. इतर निवडणुकांसारखे येथे चिन्हे नसतात. जेवढे उमेदवार निवडणुकीला उभे असतात त्या सर्वांचा पसंती क्रमांकावर आकडे लिहून मतदान करता येते.