रत्नागिरीच्या भाट्ये पुलावरील अंधाराचा प्रश्न ऐरणीवर
मनसेतर्फे बांधकाम विभाग, नगरपरिषद व ग्रामपंचायतीला निवेदन
रत्नागिरी: “दिवसा पोलवर कावळे आणि रात्री पुलावर अंधार!” अशा शब्दांत रोष व्यक्त करत रत्नागिरीतील भाट्ये पुलावर पथदिवे बसवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. आज दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी मनसेतर्फे बांधकाम विभाग, रत्नागिरी नगरपरिषद आणि भाट्ये ग्रामपंचायत यांना संयुक्तरीत्या निवेदन देण्यात आले.
गेली अनेक वर्षे रत्नागिरीकरांना भाट्ये पुलावर अंधाराचा सामना करावा लागत आहे. पुलावर विद्युत खांब उभे असले, तरी त्यावर लाईट्सच नसल्यामुळे हा परिसर रात्रीच्या वेळी काळोखात बुडालेला असतो. प्रशासनाच्या या अनास्थेमुळे आणि दुर्लक्षामुळे आजवर या परिसरात अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे, भाट्ये पूल हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतानाही या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
या निवेदनादरम्यान प्रशासनाची टोलवाटोलवी समोर आली आहे. पुलाच्या पथदिव्यांचे वीज बिल कोण भरणार, असा सवाल उपस्थित करून सार्वजनिक बांधकाम विभाग सर्रास हात झटकत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जबाबदारी झटकणाऱ्या बांधकाम विभाग, नगरपरिषद आणि भाट्ये ग्रामपंचायत या तिन्ही यंत्रणांना जाब विचारत तातडीने पुलावर लाईट्स बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाट्ये पुलावर पथदिवे लागल्यास सुरक्षेचा प्रश्न सुटण्यासोबतच पर्यटनाच्या विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी मनसे शहर संघटक तथा माथाडी कामगार सेनेचे राज्य उपचिटणीस अमोल अर्जुन श्रीनाथ, उपशहर अध्यक्ष राहुल खेडेकर, विभाग अध्यक्ष दिलीप नागवेकर, अक्षय सुतार, प्रसाद भाटकर, संजय आंग्रे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची लवकर दखल न घेतल्यास मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.