चिपळूणकरांचा गणेशोत्सव उड्डाणपुलाविनाच
सुरक्षेच्या कारणास्तव महामार्ग प्रशासनाचा मोठा निर्णय
चिपळूण ः गणेशोत्सवात चिपळूणकरांना उड्डाणपुलावरून वाहतूक करण्याची आशा होती; मात्र पावसाने त्यावरही पाणी फेरले आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या भरावाचे काम विस्कळीत होत असून, सुरक्षेच्या कारणास्तव गणेशोत्सव काळात पुलावरील वाहतूक सुरू न करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुलाखालील सेवारस्त्याची एक लेन वाढवण्याचे काम सुरू केले आहे.
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका ते बौद्धवाडीपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन होते; मात्र पुलाच्या दोन्ही बाजूंच्या अप्रोच रोडसाठी करण्यात येत असलेला सुमारे १२ मीटरचा भराव पावसामुळे खचत आहे. भरावाचे कॉम्पॅक्शन होत नसल्याने तो एकसंध राहत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गाच्या सचिवांसोबत झालेल्या बैठकीत घाईने पूल वाहतुकीसाठी खुला करणे सुरक्षेच्यादृष्टीने योग्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सध्या पुलाखालील कोकणाकडे जाणारी एक लेन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी सांगितले की, “उड्डाणपूल पूर्णपणे सुरक्षित आहे; मात्र जोडरस्त्याचा भराव स्थिर होणे आवश्यक आहे. पाऊस थांबल्यानंतर पुढील कामाबाबत निर्णय घेण्यात येईल.”
दरम्यान, पुलाखाली सीएनजी गॅस भरण्यासाठी करण्यात येणारे पार्किंग बाजूला करून वाहतुकीसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुलाखालील वाढीव लेनचे काम सुरू
गणेशोत्सव लक्षात घेता पुलाखालील कोकणाकडे जाणारी एक लेन वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आता पुलाखालील एका लेनचे काम सुरू करण्यात आले आहे. पूल पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यावर एक रेडी कोट टाकला तर तो कधीही सुरू करता येईल; मात्र पाऊस थांबल्यानंतर या विषयावर काम सुरू करण्याबाबत निर्णय घेता येईल. सद्यःस्थितीत पुलाखालील तात्पुरत्या वाढीव लेनचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी आपण उड्डाणपुलाखाली सीएनजी गॅस फिलिंगसाठी जे पार्किंग केले जात आहे ते बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अनामिका जाधव यांनी सांगितले.
सर्व्हिस रोडवरूनच धावणार वाहने
कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची वाहने आता उड्डाणपुलाऐवजी सर्व्हिस रोडवरूनच धावणार आहेत. उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यासाठी (अप्रोच रोड) सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे भरावाचे काम स्थानिक जागरूक नागरिकांनी मध्यंतरी थांबवले. कामातील त्रुटी आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन नागरिकांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेनंतर पुलाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणे अशक्य झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहने कोकणात दाखल होतात. या काळात वाहतूककोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून दोन्ही बाजूंच्या सर्व्हिसरोडची तातडीने डागडुजी आणि दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.