रत्नागिरी ते लाजूळ बस फेरी पूर्ववत करण्याची बहुजन समाज पार्टीची मागणी
विभाग नियंत्रकांना दिले निवेदन
रत्नागिरी:
रत्नागिरी ते लाजूळ दरम्यान धावणारी एसटी बस फेरी पूर्वीप्रमाणेच दररोज सकाळी ८.२० वाजता सोडण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टी रत्नागिरीच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) रत्नागिरी विभाग नियंत्रकांना मंगळवारी सविस्तर निवेदन देण्यात आले. निवेदनाची दखल घेत वाहतूक अधिकारी यादव साहेब यांनी बस फेऱ्यांबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून विद्यार्थी वर्गाच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.
लाजूळ गावातील शालेय विद्यार्थ्यांना दररोज वेळेवर बस उपलब्ध होत नसल्यामुळे शाळेत पोहोचण्यासाठी दररोज तब्बल एक तास पायी चालत जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक त्रासासोबतच मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले. पूर्वीप्रमाणे सकाळी ८.२० वाजताची फेरी पूर्ववत सुरू झाल्यास लाजूळ व परिसरातील विद्यार्थ्यांचा पायपीट करण्याचा त्रास कायमचा वाचणार असून त्यांना वेळेत शाळेत पोहोचणे शक्य होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या वेळी निवेदन देताना बहुजन समाज पार्टी रत्नागिरीचे विविध प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये बसपा रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा प्रभारी किशोर पवार, विधानसभा महासचिव राजू जाधव, विधानसभा उपाध्यक्ष अनंत पवार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी अनिकेत पवार तसेच रत्नागिरी शहराध्यक्ष रुपेश कांबळे यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या या समस्येवर एसटी प्रशासनाने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी या वेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.