
मान्सूनपुर्व पावसामुळे कोदवली धरणातील पाणीसाठयात वाढ
रत्नागिरी:- गेले काही दिवस पडलेल्या मान्सूनपुर्व पावसाने राजापूरकरांना दिलासा दिला आहे. शहराला नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाणीसाठयात वाढ झाल्याने आता शहरात दोन दिवसा आड ऐवजी एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली आहे.
यापवर्षी वाढत्या उष्ण तापमानामुळे मार्च मध्येच कोदवली धरणात खडखडाट झाला होता. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने मार्चमध्येच प्रारंभी एक दिवसाआड व त्यानंतर एप्रिल मध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र गतसप्ताहात पडलेल्या मान्सूनपुर्व पावसाने राजापूरकरांना दिलासा दिला आहे. शहराला नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाणीसाठयात वाढ झाली आहे. त्यामुळे आता दोन दिवसा आड ऐवजी एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोदवली धरणाकडील साठवण टाकीत येणारे पाणी काही प्रमाणात चालू झाल्यामुळे राजापूर शहरात दोन दिवस आड होणारा पाणीपुरवठा मंगळवार २८ मे पासून एक दिवस आड ५० मिनिटे करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.