
दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये रत्नागिरीचा समावेश
पाणी योजनेत सवलत; ८३ लाखांच्या कामांना मंजूरी
रत्नागिरी:- लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे पाणी योजनांच्या कामांना सुट मिळाली आहे. मंत्रालयस्तरावरून जिल्ह्य़ातील ८३ लाखांच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.
संभाव्य पाणी टंचाई आराखडा २०२३-२४ मधील प्रस्तावित योजनांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या आचारसंहिता कालावधीत मान्यता मिळाली आहे. प्रस्तावित कामे कोणत्याही परिस्थितीत येत्या १५ जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असे पत्र जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता काळात दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील पाणी योजनांची कामे वगळण्यात आले होती. पण त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश नव्हता. निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता काळात घालण्यात आलेल्या अटींमुळे जिल्ह्यातील कामे रखडली होती. पण आता मंत्रालयस्तरावरून मिळालेल्या मंजूरीमुळे कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिह्यातील ५ नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करणे, ३ तात्पुरती पूरक नळ पाणी योजना करणे, १० विहिरीतील गाळ काढणे/दुरुस्ती करणे इतक्या कामांचा समावेश होता. त्या कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत कामांच्या निविदा काढणे, कार्यारंभ आदेश देणेसाठी परवानगी मिळण्याची विनंती करण्यात आली आहे. प्रस्तावित केलेल्या योजनांना कोणाचाही राजकीय फायदा मिळविण्यासाठी उल्लेख नसावा, या अटीच्या अधीन राहून, मान्यता देण्यास भारत निवडणूक आयोगाची हरकत नाही. याप्रमाणे संदर्भाधीन पत्र क्रमांक २ अन्वये भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी मान्यता दिली आहे.