
बारावीच्या निकालात पुन्हा कोकण बोर्डच अव्वल !
रत्नागिरी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. सलग १३व्या वर्षी कोकण बोर्डाने राज्यात ९७.७१ टक्के निकालासह अव्वल क्रमांक मिळवला आहे. तर ९१.९५ टक्के निकालासह मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल नोंदवला आहे. यावर्षी देखील कोकणात मुलींनी निकालात बाजी मारली आहे.
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर झाला. कोकण बोर्डाच्या विभागीय प्रभारी सचिव तथा माध्यमिक शिक्षण अधिकारी सौ. सावंत यांनी कोकण बोर्डाच्या निकालाची माहिती दिली.
राज्यात फेब्रुवारी-मार्च २०२४ची लेखी परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत पार पडली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४८ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये रत्नागिरीतील ५४ तर सिंधुदुर्गमधील ९४ कनिष्ठ महाविद्यालये सहभागी झाली होती. या परीक्षा एकूण ६१ परीक्षाकेंद्रांवर घेण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यात ३८ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अशी ६१ परीक्षाकेंद्र होती. या परीक्षाकेंद्रावर २४८ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या.