
शिरगाव केंद्रातून ”रत्नागिरी-८” भात बियाण्याची ३० टन विक्री
डॉ. विजय दळवी ; पालघर, ठाणे, रायगडसह कोल्हापूरमधूनही मागणी
रत्नागिरी, ः येथील शिरगाव भात संशोधन केंद्रातून तयार झालेल्या बारीक दाण्याच्या भातजातींच्या बियाण्यांना शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे. यंदा कोकण कृषी विद्यापीठाने २०० टन भात बियाण्याची विक्री केली. शिरगाव कृषी संशोधन केंद्रातून रत्नागिरी ८ या बियाण्याची ३० टन विक्रमी विक्री झाली, अशी माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी विजय दळवी यांनी दिली.
मे महिन्यात कोकणातील शेतकरी भातशेतीच्या तयारीला लागतो. प्रारंभी लागवडीसाठी आवश्यक भात बियाणे शोधले जाते. कोकणातील वातावरणाचा अंदाज घेऊन भातपिकाची तयारी केली जाते. भात खाचराच्या भौगोलिक परिस्थितीनुसार हळव्या, निमगरव्या व गरव्या जातीची मागणी शेतकरी करतो. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन यंदा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील शिरगाव कृषी संशोधन केंद्राने ५५ टन विविध भात बियाण्यांचे उत्पादन केले आहे. या बियाण्यामध्ये रत्नागिरी-१ चे ६ टन, रत्नागिरी-६ चे नऊ टन, रत्नागिरी-७ (लाल तांदूळ) चे २.५ टन, रत्नागिरी-८ चे २५ टन, रत्नागिरी-२४ चे एक टन असे सुमारे ४३.५ टन भात बियाणे विक्रीसाठी ठेवले होते. उपलब्ध बियाण्यांमध्ये रत्नागिरी-८ या बियाण्याची २५ टनाची विक्रमी विक्री झाली. कोल्हापुरातील शेतकऱ्यांना सर्वाधिक २० टन बियाणे दिले. त्यामध्ये रत्नागिरी-१ पाच टनाचा समावेश आहे तसेच एका खासगी कंपनीच्या माध्यामातून रत्नागिरी-८ भात बियाणे विदर्भापर्यंत पोचले.
मे महिन्यापासून शिरगाव येथील भात संशोधन केंद्राकडे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी नोंदवली होती. त्यानुसार पालघर-ठाणे येथे रत्नागिरी- ६चे आठ टन, रत्नागिरी-८चे तीन टन, रत्नागिरी-६चे दोन टन बियाणे देण्यात आले. काही बियाणी ही दापोली व फोंडाघाट येथून वितरित केली गेली. रत्नागिरी तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांना ३२ टन बियाणे देण्यात आले तसेच रत्नागिरी-८ या भात बियाण्यासाठी कोतवडे, गणेशगुळे, काळबादेवी येथे लागवडीला प्रोत्साहन दिले गेले.