
फरशी तिठा येथे पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर्स पाणी वाया
चिपळूण:- पेढे येथून लोटे औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जुनी पाईप लाईन अचानक फुटल्याने पाण्याचे फवारे २० ते २५ फूट कारंज्यासारखे उडून लाखो लिटर्स पाणी वाया गेले, तर परिसरातील अनेक लहानमोठी, दुकाने, टपऱ्यांमध्ये पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. जुनी पाईप लाईन फुटलेल्या ठिकाणी पाच ते सात फुटाचा मोठा खड्डा पडला असून परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. ही घटना काल मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान फरशी तिठा येथे घडली.
लोटे औद्योगिक वसाहतीला वाशिष्ठी नदीतून पाईप लाईनद्वारे नियमित पाणी पुरवठा केला जातो. ही लाईन फरशी नाका येथे महामार्गाखालून जाते. गेले काही दिवस येथील लाईनला गळती लागली होती. स्थानिक नागरिकांनी याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती, परंतु त्याकडे कोणी गांभिर्याने लक्ष दिले नाही. येथे अनेक दिवस हा प्रकार सुरुच होता, अखेर मंगळवारी सायंकाळी अचानक पाईप लाईन फुटली व आकाशाच्या दिशेन उंचच उंच पाण्याचे फवारे उडू लागले.
हे पाणी जवळच असलेल्या गडदे वडापाव, कलिंगड विक्रेता, भाजीचे दुकान, मंचुरीयनची टपरी, तसेच येथे झोपडी बांधून असलेल्या घिसाड्याच्या झोपडीत पाणी व चिखलाचे साम्राज्य पसरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. पाईप लाईन फुटताना मोठा आवाज झाला व ५ ते ७ फुटाचा खड्डा पडला आहे. रस्त्यावर दगड, गोठे व चिखलाचे पाणी वाहू लागल्याने वाहतूकही ठप्प झाली. अचानक आलेल्या या संकटामुळे नागरिकांचीही पळापळ झाली. काय झाले हे काही काळ कोणालाही कळत नव्हते. बघ्यांची गर्दी झाली होती.
परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले होते. पेढे सरपंच आरुषी शिंदे, माजी जि.प. सदस्य विश्वास सुर्वे, दशरथ दाभोळकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ मदत कार्यासाठी पुढे आले. काही काळाने तेथील वाहतूक सुरळीत करण्यात आली. ज्यांचे या दुर्घटनेत नुकसान झाले आहे त्यांचे हातावर पोट असल्याने त्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे. रात्री घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.