
वर्षभरात जिल्ह्यात ३ हजार ५५१ जणांना विंचू दंश
रत्नागिरी:-जिल्ह्यात दरवर्षी विंचूदंशाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ हाेत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ३,५५१ जणांना विंचूदंश झाला असून, त्यांना जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. या सर्वांवर वेळीच उपचार करण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला.
जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शेतीची लावणी व कापणीची कामे त्या-त्यावेळी सुरू असतात. त्याच काळात सर्प आणि विंचूदंशाचे प्रमाण अधिक असते. अनेकदा विंचूदंश वा सरपटणाऱ्या प्राण्यांचा दंश झाल्याचे लक्षात येत नाही. मात्र, त्यानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. विंचूदंशानंतर रक्तदाब कमी जास्त होणे, नाडीचे ठोके कमी जास्त होणे, हृदयाचे ठोके वाढणे, कमी होणे असा त्रास सुरु होतो. त्यामुळे असा त्रास सुरू होताच तातडीने विष उतरविण्यासाठी रुग्णाला दवाखान्यात दाखल करणे अवश्यक असते. अनेकदा उशीर झाल्याने रुग्णांच्या शरीरात विष भिनते. त्यामुळे विष उतरवण्यासाठी अधिक प्रमाणात इंजेक्शन्स द्यावी लागतात. मात्र, जिल्हा रुग्णालये आणि इतर शासकीय रुग्णालयांमध्ये विंचूदंशावर औषधे उपलब्ध असल्याने रुग्णांवर वेळेवर उपचार हाेत आहेत.
गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ३,५५१ जणांना विंचूदंश झाल्याचे समाेर आले आहे. यामध्ये सर्वाधिक विंचूदंशाचे रुग्ण चिपळूण तालुक्यात ८५६ इतके आहे. त्याखालाेखाल खेड तालुक्यात ८२८ इतके आहे. सर्वांत कमी विंचूदंशाचे रुग्ण राजापूर तालुक्यात आहेत. तालुक्यात वर्षभरात २३ जणांना विंचूदंश झाला आहे.
‘काळा विंचू’ आणि ‘लाल विंचू’ अशा दोन प्रकारचे विंचू सापडतात. त्यामध्ये ‘लाल विंचू’ हा अतिविषारी असतो. ताे आकारानेही लहान असतो. जिल्ह्यात चिपळूण आणि खेड या तालुक्यांमध्ये अतिविषारी इंगळी (विंचू) चे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या भागातील इंगळी दंशाच्या रुग्णांना विषबाधा अधिक होण्याचे प्रमाण पाहता व्हॅक्सिनचे डोस अधिक द्यावे लागतात.
जिल्ह्यात शेतीची कामे म्हणजेच लावणी आणि कापणीच्या कामाच्या वेळी विंचूदंशांच्या घटना घडतात तसेच कापणीच्या वेळी विंचू अधिक बाहेर पडतात. अशावेळी शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक व सावधगिरीने काम करणे आवश्यक असते. कारण याच कालावधीत विंचू दंशाचे प्रमाण अधिक असते.