
शीळ धरणाजवळ संरक्षक भिंत
खचणाऱ्या भागाचे संरक्षण ; १४ कोटींचा निधी मंजूर
रत्नागिरी: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या सांडव्याकडील बाजूच्या डोंगराचा भाग दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीत खचला होता. त्यामुळे धरणाला धोका पोचू नये यासाठी संरक्षक भिंत उभारणीचा १४ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे.
शीळ धरणावरून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होतो. फणसवळे शीळ नदीवर हे धारण बांधण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाचे हे धरण असले तरी रत्नागिरी नगरपालिकेने भाडेतत्त्वावर ते घेतले आहे. महिन्याला सुमारे साडेपाच लाख पाण्याचा कर नगरपालिका पाटबंधारे विभागाला देते. या पाण्यावर १०० टक्के अधिकार पालिकेचा आहे. ते अन्य दुसऱ्या कोणत्याही वापरासाठी आरक्षित नाही. धरणाची पाणीसाठ्याची क्षमता ४.३१७ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या रत्नागिरी शहराला दिवसाला सुमारे २० एमएलडी पाणीपुरवठा या धरणातून केला जातो. पानवल, नाचणेतील तलाव सोडले तर पाणीपुरवठ्याचा सर्वात जास्त भर शीळ धरणावर आहे. शीळ धरणामुळेच उन्हाळ्यात रत्नागिरीची तहान भागते. शहरात १० हजार नळजोडणीधारक असून, त्यांना पाणीपुरवठा होत असतो; परंतु गेल्या काही वर्षापासून होणाऱ्या अतिवृष्टीत शीळ धरणाच्या सांडव्याच्या बाजूने असलेला डोंगर खचायला सुरवात झाली. त्यामुळे शीळ धरण आणखी मजबूत व सुरक्षित करण्याकडे लक्ष घालण्यात आले आहे. २ वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत धरणाच्या सांडव्याच्या बाजूला काही भाग खचला होता. त्यामुळे धरणाला काही अंशी धोका निर्माण झाला. दरवर्षी थोडा थोडा भाग खचत असल्याने डोंगराचा भाग मजबूत करण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यासाठी १४ कोटीचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने शीळ धरणाच्या बाजूला खचणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी संरक्षक भिंत बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे.