
आमदार राजन साळवी यांनी आपल्या आमदारकीची चिंता करावी – किरण सामंत
रत्नागिरी :मला खासदार करण्यासाठी महायुतील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सक्षम आहेत. राजन साळवींनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी. लांजा-राजापूर विधानसभेची जागा कॉंग्रेसला जाण्याची शक्यता आहे. साळवी ठरल्या प्रमाणे सातत्याने एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाणावर ही जागा लढावी. अन्यथा मी लांजा-राजापूर मतदारसंघातून धनुष्यबाण चिन्हाचा उमेदवार असेन, असा थेट इशारा किरण उर्फ भैय्या सामंत यांनी राजन साळवी यांना
दिला.
किरण सामंतांचे कोकणात चांगले काम आहे. अशा नेत्याला महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळेल, असे वक्तव्य उबाठाचे आमदार राजन साळवी यांनी केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्याला किरण सामंत यांनी चोख उत्तर आणि मित्रत्वाचा सल्ला देताना ते बोलत होते.
सामंत म्हणाले, भविष्यात लांजा -राजापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजन साळवींनी प्रथम आपली आमदारकी वाचवावी असा सल्ला किरण सामंत यांनी दिला आहे. राजन साळवी हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत याची मला कल्पना आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश न केल्यास मी स्वतः लांजा राजापूर मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हाचा उमेदवार असेन, असा इशारा किरण सामंत यांनी राजन साळवी यांना दिला आहे.
किरण सामंत यांच्या या वक्तव्याने राजन साळवी देखील राजकीय पटलावर आले आहेत. फोडाफोडीच्या राजकारणामध्ये ते कोणाच्या संपर्कात होते, याचा जणून किरण सामंत यांनी खुलासाच केला आहे. सामंत-साळवी यांच्यातील हे द्वंद्व अनेक राजकीय घडामोडीची भांडाफोड करणाऱ्या ठरणार आहेत.