
राजापूरात नदीपात्रात भरतीचे पाणी शिरल्याने वाहने पाण्यात
रत्नागिरी: बुधवारी दुपारी अचानक शहरातील जवाहर चौक ( दादर ) येथील खर्ली नदीपात्रात भरतीचे पाणी शिरल्याने या ठिकाणी पार्क करुन ठेवण्यात आलेली वाहने या भरतीच्या पाण्यावर तरंगु लागली. काही स्थानिक नागरिकानी ही वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
या ठिकाणी गतवर्षी गाळ उपसा केल्यापासुन भरतीचे पाणी भरत आहेत. गतवर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यावेळी राजापूर नगर परिषद प्रशासनाने सुचना फलक लावला होता. मात्र यावर्षी अद्यापही नगर परिषदेने सुचना फलक न लावल्याने व नदीपात्रात जाणारा रस्ताही बंद न केल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अमावास्या आणि पोर्णिमेला समुद्राला भरती येते. त्यामुळे जैतापूर खाडीचे पाणी अर्जुना आणि कोदवली नदीपात्रात शिरते. बुधवारी दुपारी अचानक भरतीचे पाणी वाढू लागले आणि खर्ली नदीपात्र पाण्याने भरून गेले. या ठिकाणी ऐरवी नदीपात्र कोरडे असल्याने वाहने पार्क केली जातात. मात्र बुधवारी अचानक भरतीचे पाणी शिरल्याने वाहने नदीपात्रात अडकली. आणि पाण्याचा जोर वाढताच ती तरंगू लागली.