
रिक्षा संघटनेच्या निवडणुकीवरील बहिष्कारास स्थगिती
रत्नागिरी:- शासनाच्या मुक्त रिक्षा परवान्यामुळे अडचणीत आलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी जिल्ह्यात होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय हा सध्या स्थगित करण्यात आला आहे. यासंदर्भात रत्नागिरी जिल्हा प्रवासी वाहतूक संघटना व जिल्हा प्रशासन तसेच परिवहन अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र आचारसंहितेनंतर या बाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही तर पुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला.
शासनाकडून देण्यात आलेल्या मुक्त रिक्षा परवाना धोरणामुळे अडचणीत आलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या बाबतचे निवेदन २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी यांना देण्यात आले होते. मुक्त रिक्षा परवान्यामुळे शहरात रिक्षांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसायावर परिणाम होत आहे. तसेच अनेक शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मालकीच्या रिक्षांनाही वाहतुकीचा मुक्त परवाना मिळत आहे. त्यामुळे पोटापाण्यासाठी रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात या मुक्त परवान्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. गुरूवारी या बाबत निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीला जिल्हा प्रवासी वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सहाय्यक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर उपस्थित होते.