
रत्नागिरीत एकाच दिवशी मनसे, शिवसेना ठाकरे गटाची प्रचार सभा
रत्नागिरी: तिसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदानानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भावी खासदार कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरीमध्ये उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. अशातच २९ एप्रिलला मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची प्रचार सभा रत्नागिरीमध्ये पार पडणार आहे. एकाच वेळी, एकाच दिवशी पार पडणाऱ्या या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे २९ एप्रिलला रत्नागिरीच्या दौऱ्यावर असणार आहेत. तसेच ते रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेला संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे मनसेची देखील रत्नागिरीमध्ये सभा होणार आहे. त्यामुळे पार पडणाऱ्या या सभेमध्ये शिवसेना मनसे आमनेसामने येणार आहेत. रत्नागिरीमध्ये संध्याकाळी ६ वाजता मनसेच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे तर शिवसेनेच्या दोन वेगवेगळ्या भागात सभा होणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांकडून आपल्या आपल्या मतदारसंघात सभा घेतल्या जात आहे. राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या सभेमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तसेच काही दिवसांआधी मनसे भाजपाला बिनशर्त पाठिंबा देत आहे, असे घोषित केले. यानंतर मनसेवर अनेक टीका देखील करण्यात आल्या तर काही पदाधिकाऱ्यांनी मनसेचा राजीनामा दिला. त्यामुळे आता मनसेकडून प्रत्येक जिह्ल्यात भाजपचा प्रचार केला जात आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे निवडणूक लढणार आहे. नारायण राणे महायुतीचे उमेदवार आहेत. तर शिवसेनेकडून या भागासाठी विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे रत्नागिरीमध्ये जात आहेत तर नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे रत्नागिरीमध्ये जात आहेत. राणे हे ठाकरे कुटुंबियांचे कट्टर विरोधक आहेत.