
शाळांना २ मे पासून उन्हाळी सुटी
यंदा ४५ दिवस सुट्टी
रत्नागिरी : जिल्हा परिषदच्या शाळांच्या सुट्टीचा कालावधी निश्चित झाला असून २ मे ते १५ जून या कालावधीत सुट्टी असणार आहे. यावर्षी तब्बल ४५ दिवस सुट्टी असल्याने मुलांसह शिक्षक आनंदीत झाले आहेत.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शासनाने सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरू करण्याबाबतच्या सूचना शिक्षण संचालयाने दिल्या आहेत. त्यानुसार आगामी शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. तर २ मे पासून उन्हाळा सुट्टीला सुरूवात होणार आहे. यामुळे यावर्षी तब्बल ४५ दिवस सुट्टी असणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिकच्या २ हजार ५०० आणि माध्यमिकच्या ३५० अशा जवळपास २ हजार ८५० शाळांना २ मे पासून शाळांना कुलुपे लागणार आहेत.