
रत्नागिरी शहरातील दिवसाआडची पाणीकपात रद्द
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात दिवसाआड होणार असलेली पाणीकपात तूर्त रद्द करण्यात आली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये १.१७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. तो १५ जूनपर्यंत पुरेल, असा विश्वास रत्नागिरी पालिकेने व्यक्त केला आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एक दिवस आड पाण्याचे संकट तूर्तास तरी दूर गेले आहे.
रत्नागिरी शहरात ११ हजार २८८ नळजोडण्या आहेत. त्याद्वारे दिवसाला २० दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने यावर्षी तीन महिने आधीपासून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात करून शहराला पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. त्यानुसार दर सोमवारी व गुरुवारी पाणीकपात केली जात आहे.