
हापूसने धरली कॅनिंगची वाट; किलोला ३० रुपयांचा भाव
रत्नागिरी :हंगामाच्या सुरुवातीला चांगला दर मिळणार्या हापूस आंब्याची आवक वाढल्यानंतर दरात घसरण झाली आहे. दुसर्या टप्प्यात आता स्थानिक बाजारपेठेत हापूस मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. अशातच आता हापूसने कॅनिंगची वाट धरली आहे. मात्र, येथेही किलोमागे केवळ 30 रुपयेच दर मिळत आहे. कॅनिंगसाठीतरी दर 40 रुपये मिळवा, अशी मागणी आता बागायतदरांनी केली आहे.
फेब्रुवारीच्या मध्यात सुरू झालेला हापूस आंब्याचा हंगाम काही भागांमध्ये अंतिम टप्प्यात आला आहे. वाशीतील बाजार समितीमध्ये आवक वाढल्यामुळे दिवसेंदिवस हापूसच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे आता आंब्याने अंतिम टप्प्यातील कॅनिंगची वाट धरली आहे. वानर-माकडे, बदलते हवामान व चोरट्यांचा वावर अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आंबा बागायतदार आपला व्यवसाय करत आहेत. यावर्षी हंगामाची सुरुवात फेब्रुवारीमध्ये झाली. मार्चमध्येही कोकणातून बाजारात जाणार्या पेट्यांची संख्या अधिक होती. सुरवातीला चांगला दर मिळत होता; मात्र आता आंब्याची आवक वाढल्यामुळे दर काही प्रमाणात घसरू लागला आहे.
उन्हामुळे आंबा लवकर काढणी योग्य होत आहे. बाजारात आवक वाढली आहे. परिणामी, दर घसरला आहे. सुरवातीच्या टप्प्यात आलेल्या मोहोरामधून चांगले उत्पादन आले होते. त्याला बाजारात चांगला दर मिळाला. येत्या आठ दिवसात हा बहर संपेल. त्यानंतर आलेल्या मोहोरातील उत्पादन हाती येण्यासाठी बागायतदारांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढत बागायतदार व्यवसाय करत आहेत. दुसर्या टप्प्यातील आंबा मे महिन्यामध्ये तयार होण्याची शक्यता आहे. त्यामधून मिळणारे उत्पादन हे पावसाच्या आगमनावर अवलंबून आहे. आंबा मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे वाशी बाजारातील दर उतरले असून, काही बागायतदार कमी दर्जाचा आंबा कॅनिंगसाठी देत आहेत.