
रेशन कार्डसंदर्भातील कामं रखडली
पुरवठा विभागाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
रत्नागिरी : निवडणूक आचारसंहितेचे कारण देत तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागातील काही कर्मचारी अत्यावश्यक रेशन कार्डसंदर्भात कामेही रखडवून ठेवली जात आहेत. त्यामुळे गरिबांना रेशन दुकानांवर धान्य मिळेनासे झाले आहे. याबाबतची तक्रार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
चौकशीसाठी कार्यालयात येणाऱ्यांना काहीही कारणे देऊन वेळ मारून नेली जात आहे. रेशन दुकानात धान्य मिळत नसल्याची किंवा रेशन कार्ड बंद झाले असून, ते सुरू करून देण्याच्या तक्रारी तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागात करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून रेशन कार्ड बंद झाल्याने रास्त दराचे धान्य मिळालेले नाही. यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहेत. दोन महिने झाले तरी तक्रारदारांचे रेशन कार्ड सुरू होऊन त्यांना धान्य मिळण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आठ दिवसांनी या दहा दिवसांनी या असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. यासंदर्भात आता जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे.