
रत्नागिरी तालुक्याला टंचाईच्या झळा
दोन ग्रामपंचायतींकडून टॅंकरची मागणी ; जयगड पंचक्रोशीला पर्यायी व्यवस्था
रत्नागिरी, : तालुक्याला पाणी टंचाईच्या चांगल्याच झळा बसू लागल्या असल्या तरीही सतर्क प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करत नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात शासकीय टॅंकर धावलेले नाहीत. कळझोंडी धरण कामासाठी रिकामे केल्यामुळे दशक्रोशीतील १३ ग्रामपंचायतीवर टंचाईचे संकट आहे. जिंदल कंपनीच्या पाणी योजनेवरून ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा केला जात आहे. शिरगाव, जांभारी ग्रामपंचायतीला टॅंकर सुरू झाला असून मिऱ्या आणि सोमेश्वर ग्रामपंचायतीने टॅंकरसाठी मागणी केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तालुक्यातील काही भागांमध्ये पाणी टंचाईची तिव्रता वाढण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडून तालुक्याचा आराखडा बनवताना काळजी घेण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाकडून कार्यवाही केली जात आहे. गतवर्षी तालुक्यात नव्या पाणी योजना मंजूर केल्यामुळे टंचाईग्रस्त गावे, वाड्या कमी करण्यात यश आले. वेळ प्रसंगी खासगी टॅंकरने लोकांना पाणी पुरवले. त्यामुळे यंदा पाणी टंचाई कमी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी पडला. त्यामुळे धरणातील पाणी साठा कमी झालेला आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच अनेक धरणांचा साठा ५० टक्केच्या खाली आला आहे. त्यात कळझोंडी धरणाची उंची आणि साठवण क्षमता वाढविण्यासाठी दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. त्यासाठी धरणातील पाणी सोडण्यात आले. त्याचा मोठा फटका दशक्रोशीला बसण्याची भीती होती. सुरवातीला पाणी टंचाईची मोठी झळ बसली. जिंदल कंपनीशी बैठक घेऊन त्यांच्या पाणी योजनेवरून बाधित झालेल्या १३ ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करण्याचे निश्चित केले. त्यामुळे सध्या त्या ग्रामपंचायतींवरील पाणी संकट दूर झाले आहे.
तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींमध्ये शिरगाव आणि जांभारी ग्रामपंचायतीला पाणी टंचाई भासत आहे. तेथे प्रशासनाकडुन टॅंकर सुरू करण्यात आला आहे. त्या परिसरात वापरातील विहिरीचे पाणी मंचूळ झाल्यामुळे त्यांना हा पाणी पुरवठा सुरू आहे तर सोमेश्वर आणि मिऱ्या ग्रामपंचायतीने पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी टॅंकरची मागणी केली आहे. त्याबाबतचा अहवाल तहसिलदारांना दिला असून लवकरच टॅंकर सुरू करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांनी सांगितले.