
मिर्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे ४० टक्के काम प्रगतीपथावर
रत्नागिरी :मिर्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे 56 किमीचे जिल्ह्यातील काम वेगाने सुरु असून जवळपास 25 टक्के काम पूर्ण झाले असून 40 टक्के काम प्रगतीपथावर आहे. पावसाळ्यापयर्र्त 60 टक्के काम पूर्णत्वाला नेण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न सुरु आहे. यातील साडेसात किमीच्या जागेचा मोबदला न दिला गेल्यामुळे काही ठिकाणी कामाला ब्रेक मिळत आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागणार असल्याने सहा महिन्यांची मुदत केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडे वाढवून मागण्यात आली असल्याने मे 2025पयर्र्त आंबा घाटापयर्र्त रस्ता पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
मिर्या-नागपूर महामार्गाच्या आंबा घाट ते मिर्या या रस्त्याचे काम रवी इन्फ्राबिल्ड या कंपनीकडे आहे. सन नोव्हेबर 2022मध्ये या कंपनीने काम सुरु केले असून, काम पूर्ण करण्याची मुदत नोव्हेंबर 2024 आहे. यासाठी सुमारे 930 कोटीचा खर्च येणार आहे. या महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक भूसंपादन केले असून, वेगाने काम सुरु आहे.
पाली ते आंबा घाट व हातखंबा ते मिर्या या दोन टप्प्यात 55.909 किमी काम असून हे काम वेगाने सुरु आहे. हा मार्ग दोन, चार व सहालेनमध्ये हे काम करण्यात येत आहे. यामध्ये सर्व्हीस रोड सुमारे 23 किमीहून अधिक तयार करण्यात येत आहे. 28 किमीचे नाले बांधण्यात येत आहेत. यामध्ये 55 किमीपैकी साडेसात किमीचा साडेसात किमीचा मोबदला अद्याप दिला गेलेला नाही. हे प्रमाण साडेतेरा टक्के आहे.
जमीन मोबदला न दिल्यामुळे या जागांचे मालकांकडून अडथळे आणले जात आहेत. त्याचप्रमाणे नवीन दराप्रमाणे पाण्याची पाईप लाईन मंजूर नसल्यामुळे काही कामे अडकली आहेत. त्याचप्रमाणे इमारती, मंदिर, मशिदीमुळेही कामे प्रभावित झाली आहे. रत्नागिरी शहरालगत एमआयडीसीच्या जागेचाही प्रश्न निर्माण झाला होता. त्यातूनही आता मार्ग निघाला असल्याने, या भागात कामे वेगाने सुरु आहेत.
जिल्ह्यात मिर्या ते हातखंबा टप्प्याला वेग आहे. जवळपास 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर 38 ते 40 टक्के काम पावसाळ्यापयर्र्त पूर्ण करण्यावर रवी इन्फ्राबिल्डचा प्रयत्न आहे. अनेक गावांमध्ये या कामासाठी ग्रामस्थांकडून सहकार्याचा हात मिळत असल्याने काम लवकर पूर्णत्वाला जाईल असे रवी बिल्डकॉनच्या अभियंत्यांनी सांगितले. कामाला सुरुवात झाल्यानंतर पावसाळ्याचे चार महिने फुकट गेले आहेत. पुढील पावसाळ्यात आणखी चार महिने कामाचा वेग मंदावणार आहे. त्यामुळे या कामाला आणखी सहा महिने मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडे मागणी करण्यात आली आहे.
साडेसात किमीचा मोबदल्याचा प्रश्न येत्या दोन-तीन महिन्यात पूर्ण होईल. काही जमीन मालक कोर्टात गेले आहेत. परंतु त्यांची रक्कम कोर्टात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाला अडथळा निर्माण होणार नाही असे रवी इन्फ्राबिल्डतर्फे सांगण्यात आले.