
हातीस मार्गावरील एसटीला ५५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष आनंदोत्सव
रत्नागिरी :तालुक्यातील हातिस सारख्या ग्रामीण भागात 1969साली पहिली एसटी बस धावली. या गोष्टीला 55 वर्ष झाल्याबद्दल ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात एसटी बसचे पुन्हा जोरदार स्वागत करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी एसटीची पूजा करण्यात आली. महिला भगिनींनी 55 दिव्यांनी गाडीचे औक्षण करुन आनंदोत्सव साजरा केला.
रत्नागिरीकरांसह महाराष्ट्रातून येणार्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पीर बाबरशेखचा प्रसिद्ध दर्गा हातिस गावात आहे. पूर्वी रत्नागिरी शहरातून याठिकाणी जाण्यासाठी अडीच तीन तासाची पायपीट करावी लागत असे किंवा होडीने प्रवास करावा लागत असे. परंतु ग्रामस्थांनी गावापर्यंत रस्ता व्हावा म्हणून त्याकाळी लोकवर्गणी जमा केली होती. त्यानंतर 1969मध्ये पहिली बस हातिस गावात धावली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी बसचे जोरदार स्वागत केले होते. या गोष्टींची आठवण ठेवत हातिस ग्रामस्थांनी नुकतेच बससेवेला 55 वर्ष झाल्याबद्दल बसचे ढोलताशांच्या जल्लोषात स्वागत केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक विजय नागवेकर यांनी श्रीफळ वाढविले तर 55 महिला भगिनींनी 55
दिव्यांनी औक्षण केले. यानिमित्ताने छोटा कार्यक्रम आयोजित करुन एसटीचे अधिकारी आरिफ
काझी, चालक संतोष ठाकूरदेसाई, वाहक विराज जाधव, सेवानिवृत्त कर्मचारी दीपक नागवेकर, कर्मचारी विशाखा नागवेकर यांचा अध्यक्ष दिवाकर नागवेकर व हातिस ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सत्यवान नागवेकर, कार्याध्यक्ष नरेंद्र नागवेकर, खजिनदार महेश कीर, सदस्य ऋषिकेश नागवेकर, राजू नागवेकर, पोलीस पाटील संतोष नागवेकर, ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत नागवेकर, जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा निवंडीकर व सहकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली.