
राज्यासह पररज्यात आंबा स्टॉल लावण्यासाठी आंबा उत्पादकांनी नोंदणी करावी
रत्नागिरी :हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत राबविला जात आहे. आगामी आंबा हंगामाकरिता आंबा उत्पादकांना पुणेसह आणि राज्यातील व परराज्यातील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध होण्याकरिता आंबा उत्पादकांची नोंदणी करण्याचे आवाहन पणन मंडळामार्फत करण्यात आले आहे.
आंबा उत्पादकांना विक्रीसाठी नेहमीच मध्यस्थांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे ते देतील तो दर पदरात पाडून घ्यावा लागतो. यातून शेतकर्यांच मोठे आर्थिक नुकसघान होते. त्यामुळे परजिल्ह्यात किंवा परराज्यात भरणारे विविध महोत्सव असो की ग्राहकांशी थेट विक्री करता यावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ सातत्याने प्रयत्न करीत असतो. गतवर्षी या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेक ठिकाणी आंबा बागायतदारांंनी स्टॉल घेऊन हापूस आंब्याची विक्री केली होती. त्यामुळे यावर्षीही थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आंबा उत्पादकांची नोंदणी करण्यात येणार आहे. 15 फेब्रुवारीपासून ही नोंदणी सुरू होणार आहे.
स्टॉल नोंदणीकरिता आंबा नोंदीसह 7/12 उतारा मागील 6 महिने कालावधीतील, आधार कार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणार्या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड प्रत व भौगोलिक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या नावे रु.10 हजार अनामत रक्कमेचा धनाकर्ष अथवा यापूर्वी अनामत रक्कम भरणा केली असल्यास पावतीची प्रत तसेच विहीत नमुन्यातील अर्ज व हमीपत्र इ. कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.