
जलयुक्त शिवार २.० मध्ये सचिवपद कृषी विभागाकडे
रत्नागिरी :कोकणात आगामी काळात अंमलबजावणी होत असलेल्या जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये जिल्हा व तालुकास्तरीय समितीमध्ये सदस्य सचिवपद कृषी विभागाला देण्यात आले आहे.
येत्या काळात अंमलबजावणी होत असलेल्या जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये जिल्हा व तालुकास्तरीय समितीमध्ये सदस्य सचिवपद कृषी विभागाला देण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी केलेल्या समित्यांमध्ये तेव्हा ही पदे मृद् व जलसंधारण विभागाकडे देण्यात आली होती. जलयुक्तचा दुसरा टप्पा प्रत्यक्षात राबविणे सुरू होण्यापूर्वी मात्र ही पदे कृषी विभागाकडे देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील विश्वासाहर्ता वाढविण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले. या अभियानाचा आढावा, संनियंत्रण व कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर उपविभागीय अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवण्यात आली. या समितीत जिल्हा स्तरावरील समितीचे सचिवपद जिल्हा जलसंधारण आणि तालुक्याला सचिवपद उपविभागीय जलसंधारण अधिकार्यांकडे देण्यात आले होते. या समित्यांमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी हे सदस्य म्हणून नेमण्यात आले. मुळात जलसंधारण विभागाकडे पुरेशी यंत्रणा नसल्याने अभियानाची अंमलबजावणी कशी होईल, याची चर्चा सुरू होती. आता पंतप्रधान कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 चे जिल्हा स्तर समितीचे सदस्य सचिव हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीच राहणार आहेत.