
शाळेच्या विकासासाठी पालकांचे सहकार्य मोलाचे ठरते : पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील
वाटद कवठेवाडी शाळेच्या भौतिक सुविधा विकसनासाठी आयोजित क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न
रत्नागिरी : ग्रामीण भागातील शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक शाळेतील पालकांनी शाळेला सहकार्य केल्यास, विद्यार्थ्यांना अपेक्षित अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा उपलब्ध होतील असा आशावाद सागरी पोलीस ठाणे जयगडचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी केला.
ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेच्या भौतिक सुविधा विकसनासाठी वाटद कवठेवाडी, वाटद तांबटकरवाडी, वाटद धोपटवाडी मधील सर्व ग्रामस्थ आणि पालक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कवठेवाडी शाळा चषक – २०२४ क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील शाळा विकसित होणे आवश्यक असून त्यासाठी शासनाच्या योजनासह पालकांनी देखील शाळेप्रती आदर व्यक्त करत भौतिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावे. यामध्ये कवठेवाडी शाळेचे ग्रामस्थ, पालक आणि शाळा यांचा संवाद खुप चांगला असल्याचे मत व्यक्त केले.
या बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित असणारे वाटद ग्रामपंचायतचे सरपंच अमित वाडकर यांनीही शाळा विकासासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे असून कवठेवाडी शाळेची प्रगती कौतुकास्पद आहे. म्हणून या शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ततेसाठी ग्रामपंचायत वाटदच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता रमेश तोटावार, केंद्रप्रमुख अरुण जाधव यांनी अभिनंदन केले.
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी, वाटद तांबटकरवाडी, वाटद धोपटवाडी मधील ग्रामस्थांच्या मदतीने ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी तालुक्यातील यश फाउंडेशनचे मिहीर बाळासाहेब माने यांच्या हस्ते झाले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत परिसरातील अनेक क्रिकेट संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये साईबाबा इलेव्हन संघ कचरे, साईबाबा इलेव्हन कांबळेलावगण आणि विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ वरवडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. तर या स्पर्धेत मालिकावीर व गोलंदाज तेजस हळदणकर, सामनावीर सुमित हळदणकर, उत्कृष्ट फलंदाज म्हणून मनिष बलेकर यांनी वैयक्तिक यश मिळविले.
या स्पर्धा यशस्वी व्हाव्यात यासाठी बक्षीसे माजी आमदार बाळासाहेब माने, स्व. श्रीधर सखाराम केदारी यांच्या स्मरणार्थ विसावा प्रतिष्ठान खंडाळा, स्व. सुभद्राबाई शांताराम धनावडे यांच्यां स्मरणार्थ रुमेश शांताराम धनावडे यांनी दिली. तर स्पर्धेसाठी आवश्यक चषक स्व. कमलावती यशवंत धनावडे यांच्या स्मरणार्थ अशोक यशवंत धनावडे, स्व. श्रीधर सखाराम केदारी यांच्या स्मरणार्थ विसावा प्रतिष्ठान खंडाळा आणि अन्वी धीरज धनावडे व महेंद्र हरिश्चंद्र धनावडे, आज्ञेश अनंत धनावडे, नितेश मोहन धनावडे यांनी अनुक्रमे प्रथम व्दितीय, तृतीय, मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांच्या माध्यमातून मिळाले. तसेच स्पर्धेसाठी समीर कुर्टे, परशुराम कुर्टे, संजय वरवटकर, योगेश आग्रे, गणेश भुवड, प्रमोद तांबटकर, सागर घवाळी, रमाकांत धोपट यांनी आर्थिक स्वरूपात सहकार्य केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळा विकास समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच अप्पा धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती धनावडे यांच्यासह प्रभाकर धोपट, गौरव धनावडे, विश्वास बारगुडे, विश्वनाथ शिर्के, अनिल रेवाळे, मारुती कुर्टे, राजेंद्र धनावडे, विलास बारगुडे, सुरेश तांबटकर, रमेश कुर्टे, मनस्वी तांबटकर, शालेय व्यवस्थापन समिती, माता – पालक संघ, शिक्षक – पालक संघ, पालक, ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली केले.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेतील प्रथम द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्या संघांनी आपल्या बक्षिसातील २५ टक्के रक्कम शाळेच्या मदतीसाठी दिली. त्याबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
या स्पर्धेचे नियोजन पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने मुख्याध्यापक माधव अंकलगे, शाळेतील शिक्षक रेणुका धोपट यांनी केले.
बक्षीस वितरण प्रसंगी पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, सरपंच अमित वाडकर, शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे, लोकनेते शामराव पेजे सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष संजय शितप, कळझोंडी तंटामुक्ती समिती अध्यक्ष संदीप पवार, माजी अध्यक्ष अप्पा आग्रे, भाऊ धनावडे यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ, विद्यार्थी, खेळाडू उपस्थित होते.