
झी २४ तासचे रत्नागिरीतील कॅमेरामन निलेश कदम यांचे निधन
रत्नागिरी :-
झी २४ तास या वृत्तवाहिनीचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट आणि शहरानजिकच्या शीळ गावचे रहिवासी निलेश कदम यांचे मुंबईतील सायन येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्युसमयी ते ४५ वर्षांचे होते.
मागील १० वर्ष कॅमेरामनच्या भुमिकेत वावरणारे निलेश कदम मागील ५ वर्षे झी २४ तासचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट म्हणून काम करीत होते. घरची शेती संभाळून त्यांनी पत्रकारितेमध्ये कॅमेरामन म्हणून आपला ठसा उमटवला. जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील अनेक घडामोडी त्यांनी कॅमेऱ्यात टिपल्या. दुरदर्शन, साम मराठी आणि झी २४ तास या ठिकाणी त्यांनी काम केले. चिपळूणच्या महापूरापासून ते जिल्ह्याात आलेल्या वादळांचे कव्हरेज त्यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सायन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांची प्राणज्योत मावळली. बुधवारी दुपारी त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी शीळ येथे आणण्यात आले. याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि लहान मुलगा असे कुटुंब आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच रत्नागिरीकरांनी हळहळ व्यक्त केली.