
रत्नागिरीत 92 कोटींचे प्रशासकीय भवन उभारणार
रत्नागिरी :राज्यातील प्रथम क्रमांकाचे 92 कोटी खर्चाचे प्रशासकीय भवन रत्नागिरीमध्ये उभारले जाणार आहे. राज्य शासनाची त्याला प्रशासकीय मान्यता मिणाली आहे. रत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान, हे स्लोगन घेऊन रत्नागिरीकर आणि प्रशासन जोरदार काम करत आहे, असे उद्गार पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी काढले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सर्वप्रथम उपस्थितीत स्वांतत्र्य सैनिक त्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी, पत्रकार आणि जिल्हावासियांना ना.सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, 500 वर्षापासून असलेली मागणी आणि प्रभू रामचंद्राचे मंदिर प्रधानमंत्री ना.नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. या ऐतिहासिक आणि महत्वाच्या पूर्णतेबद्दल जिल्हावासियांच्यावतीने प्रधानमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतत्वाखाली रत्नागिरी जिल्हा विकासात्मक घोडदौड करतोय असे ते म्हणाले.
प्रत्येकाच्या जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. जलजीवन मिशनमधून होणाऱ्या नळ पाणी योजनांसाठी 1100 कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, सिंधुरत्न ही ऐतिहासिक योजना आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी या योजनेमधून हाऊसबोट देण्यात आली आहे. महिलांनी चालविलेली हाऊसबोट येणाऱ्या पर्यटकांना पहायला मिळेल.
जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी याचा निश्चित उपयोग होणार आहे. एपीजे अब्दुल कलाम जिल्ह्यातून घडले पाहिजेत. त्यासाठी गरिबांच्या मुलांना नासा आणि इस्त्रोला पाठविणारा राज्यातील पहिला जिल्हा रत्नागिरी ठरला आहे.
सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमिनतळ टामनल इमारतीसाठी 100 कोटी राज्याने मंजूर केले आहेत. लवकरच सर्वसामान्य माणसाच्या सेवेत हे दाखल होईल आणि त्याला विमान प्रवास करता येईल. विकासाची अनेक कामे करत असताना मंडणगड, चिपळूण, दापोली, गुहागर, संगमेश्वर असेल त्याचबरोबर अन्य 9 शहरांच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे काम शासनाने केले आहे. काजू बोर्डाचे 5 वर्षासाठी 1300 कोटी मंजूर केले आहेत. आंबा बोर्ड असावे अशी आंबा बागायतदारांची मागणी होती, त्याला तत्वतः मान्यता दिली आहे. त्याचबरोबर साडेनऊ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला असून लवकरच आंबा बागायतदारांच्या खात्यात जमा होतील.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी परेड निरिक्षण केले. त्यानंतर झालेल्या संचलनात पोलीस मुख्यालय पथक, गहरक्षक दल, पोलीस बँड पथक, गोगटे जोगळेेकर महाविद्यालयाचे एनसीसी आर्मी, एनसीसी नेव्हल, पटवर्धन हायस्कूलचे एनसीसी आर्मी, एनसीसी नेव्हल, ए. डी. नाईक ऊर्दू स्कुलचे स्काऊट गाईड पथक, जवाहर नवोदय विद्यालयाचे स्टुडंड पोलीस कॅडेट पथक, पोलीस श्वान पथकाच्या व्हिक्टर डॉगकडून मानवंदना दिली.यावेळी विविध शाळांचे चित्ररथ सहभागी झाले होते.
राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र पंचमढी यांच्यातर्फे आयोजित हिमालय वुडबॅज प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील एकमेव आणि रा.भा.शिर्के प्रशालेच्या 75 वर्षांच्या वाटचालीत पहिलेच ठरलेल्या प्रशांत जाधव यांचा विशेष सत्कार पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेते निलिमा आखाडे, ज्युली रहाटे, रिध्दी माळी, मृण्मयी चिंचचौरे, साक्षी आंबे, गौरव सावंत, स्वरुप शिरगावकर, मानस गावकर, श्रती पडघन, यश खामकर यांना प्रत्येकी 1 लाख बीज भांडवल व प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि बी.के. एल वालावलकर यांना प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दैनंदिनी रोशन आंबेकर हिला जिल्हा माहिती कार्यालयातील शिपाई पदावर पालकमंत्री ना.सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी याबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली.