
आहार पुरवठ्यासह अंगणवाडी केंद्र संचालनाची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश
रत्नागिरी :अंगणवाडी कर्मचार्यांचा संप सुरु असल्याने लाभार्थी आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी आहार पुरवठ्याची, अंगणवाडी केंद्र संचालनाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकार्यांना दिल्या आहेत.
अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मागील दीड महिना अंगणवाड्या बंद आहेत. यामुळे मुलांना पोषण आहारही मिळालेला नाही. याची गंभीर दखल शासनाने घेतली आहे.
अंगणवाडी ही शासकीय मालमत्ता असून, संबंधित ग्रामपंचायतीच्या सहाय्याने अंगणवाडी सेविकांच्याकडून पंचनामा करुन अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी तत्काळ चाव्या ताब्यात घ्याव्यात. नागरी भागात बालविकास प्रकल्प अधिकार्यांनी स्थानिक नगरसेवक, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या समक्ष पंचनामे करावेत. चावी देण्यास टाळाटाळ झाल्यास कायदेशीर कारवाई करावी. अंगणवाडी केंद्रातील आहार शिजवणे व आहाराचे वाटप ग्रामपंचायतीमधील शिपाई, डाटा एन्ट्री ऑपरेटर करणार आहेत.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेची परिणामकारकपणे अंमलबजावणी व्हावी. तसेच शासनाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांना किमान 300 दिवस आहार पुरवठा करण्यासाठी आहार वाटपाची पर्यायी व्यवस्था व्हावी यासाठी दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. यामध्ये हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.