
“वाटचाल सहा दशकांची” हे आत्मकथन म्हणजे ध्येयवादी जीवन वाटचालीचा आदर्श राजपथ: डॉ. अविनाश सुपे
रत्नागिरी:- डॉ. अलिमियाँ परकार यांनी लिहिलेले वाटचाल सहा दशकांची हे आत्मकथन पुस्तक म्हणजे वैद्यकिय क्षेत्रातल्या शांत, संयमित, ध्येयवादी आणि सामाजिक बांधिलकी मानणा-या एका मनस्वी लेखकाच्या जीवन वाटचालीचा आदर्श राजपथ आहे. त्यांचे पारदर्शक विचार, त्यांची शांत संयमित वृत्ती ही वैद्यकिय पेशाला साजेशी असून समाजातल्या प्रत्येकाला त्यांचे आत्मकथन पुस्तक हे विचार करायला लावणारे आहे असे गौरवोद्गार राज्याच्या आणि देशाच्या वैद्यकिय क्षेत्रातील जेष्ठ शल्य विशारद डॉ. अविनाश सुपे (माजी डीम. के.ई.एम. हॉस्पिटल जेष्ठ लेखक) यांनी काढले. वैष्णो व्हिजन आयोजित आणि ग्रंथाली प्रकाशित रत्नागिरीतील प्रतिथयश डॉ. अलिमियाँ परकार यांच्या- "वाटचाल सहा दशकांची' या आत्मकथन पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले या पुस्तकाच्या रुपाने डॉ. परकार यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध आणि बोध हा वैद्यकिय क्षेत्रात येणा-या नवीन पिढीला मार्गदर्शक असा आहे. प्रत्येक मराठी वाचकाने आवर्जून हे पुस्तक वाचावे असे सांगून त्यांनी हे पुस्तक प्रकाशित करणा-या ग्रंथाली संस्थेचे अभिनंदन केले. रविवारी रत्नागिरीत संपन्न झालेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभाचे प्रास्ताविक वैष्णो व्हिजनच्या संस्थापक संचालिक पद्मा भाटकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोकण कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर होते. या कार्यक्रमाला रत्नागिरीतील जेष्ठ शल्यविशारद डॉ. रमेश चव्हाण, जिल्हा पोलीस अधिक्षक धनजंय कुलकर्णी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, डॉ. शाश्वत शेरे, लेखक अनुवादक प्रकाश कामत, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, संपादक अरुण जोशी, कार्यक्रम संयोजक धनश्री धारप, डॉ. मतिन परकार, ओमर परकार आणि निर्माता दिग्दर्शक जयु भाटकर उपस्थित होते. यावेळी या सर्वांनी आपल्या भाषणात डॉ. अलिमियों परकार यांच्या आदर्श जीवनशैलीचा आणि लेखन प्रतिमेचा गौरवाने उल्लेख करताना त्यांच्या सुविद्य पत्नी स्व. डॉ. मुमताज परकार यांच्या आठवणीही जागविल्या. ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी आपल्या भाषणात ग्रंथालीच्या गेल्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेताना कोकणातील साहित्य परंपरेचा गौरवाने उल्लेख केला. माझ्या आजपर्यंतच्या वैद्यकिय क्षेत्रातल्या वाटचालीत रत्नागिरीकरांनी दिलेले अपूर्व प्रेम ही माझी जीवन शिदोरी आहे. इथल्या मातीतले माझे जीवनानुभव लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे हे माझे आत्मचरित्र नाही हे अनुमव चरित्र आहे असे उद्गार पुस्तकाचे लेखक डॉ. अलिमियों परकार यांनी यावेळी काढले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीरंग कद्रेकर म्हणाले "डॉ. अलिमिया परकारांचे लेखन हे सर्वसामान्य वाचकाला रुचेल, पचेल असे आहे. जे जसं जगलो, अनुभवलं तसेच पारदर्शकपणे त्यांनी आपल्या आत्मकथनातून अधोरेखित केलेली आपली आजपर्यंतची जीवन वाटचाल यातून नव्या पिढीने आदर्श बोध घ्यावा असे हे पुस्तक आहे. मराठी साहित्य विश्वात हे आत्मकथन घराघरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचेल अशी मला आशा वाटते. रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संपन्न झालेल्या या स्मरणीय कार्यक्रमात कार्यक्रम संयोजक वैष्णो व्हिजन संस्थेच्या वतीने ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, अरुण जोशी, धनश्री धारप, रत्नागिरीचे जेष्ठ शल्य विशारद डॉ. चंद्रशेखर अपराध, जेष्ठ उद्योजक दीपक गद्रे आणि श्रीरामपूरचे जेष्ठ डॉ. प्रदीप राजे यांचा सत्कार करण्यात आला. या समारंभाला विकास मयेकर, नाझिया परकार, कॅप्टन दिलीप भाटकर, डॉ. दिलीप पाखरे, उद्योजक नजीर नाईक, उद्योजक संजीव सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन सुर्वे, माजी नगरसेविका प्रेमाताई बोरकर, माजी नगरसेविका दया चवंडे, विवेक भावे, डॉ. अनुराधा लेले, प्राचार्या प्रज्ञा बसणकर, बशीर परकार, डॉ. आत्राम, डॉ. अजित कुलकर्णी (कोल्हापूर), महेश सामंत आणि रत्नागिरीच्या विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर उपस्थित होते. जेष्ठ अभिनेता आणि लेखक निलेश पवारच्या खुमासदार श्रवणीय सूत्रसंचालनाने या कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रमाची सांगता गायिका ईशानी पाटणकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली.

